पृष्ठे

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२

दशरथ मांझी आकळले प्रेम ज्याला !

दशरथ मांझी [१९३४ ते १७ ऑगस्ट २००७] बिहारमधील एक छोटसं गाव गेहलोर इथला एक साधा सरळ  गरीब माणूस  ! प्राणप्रिया 'फाल्गुनी' वरचं त्याचं अत्युत्कट प्रेम हाच त्याचा खजिना ! त्या प्रेमफुलाचा अपघाती  मृत्यू ! कशानं ? अनघड पहाडाची ती जीवघेणी अवघड वाट त्याच्या प्रियेचा प्राण घेवून गेली. तिचं पाय घसरून पडणं, तिला वेळेवर जवळच्या शहरात योग्य औषधौपचारांपर्यंत न पोचवता येणं याला हाच पहाड कारणीभूत आहे हे कळताच हा पठ्ठ्या कोलमडला तर नाहीच उलट त्यानं जनाची पर्वा न करता थेट त्या पर्वताला हटवायला सुरुवाट केली.

या पहाडाला ७० किमीचा वळसा घालूनच शहरात जावं लागे. आजवर अशा अनेक फाल्गुनी व दशरथांना या ७० किमीनं यमपुरीचा पत्ता सांगितला होता. आता मात्र त्याची गाठ होती एका खऱ्या भगीरथ  वारसाशी ! पुढचे २२ वर्षं [१९६०-१९८२] दशरथ मांझीनं त्या लाल पहाडावर आपलं रक्त आटवलं व अखेर रस्ता तयार केला.

गेलेल्या फाल्गुनींच्या स्मरणार्थ नवीन फाल्गुनींना वाचविण्यासाठी ७० किमीचं अंतर फक्त ७ किमीवर आणलं सुरुवातीला वेडा ठरवून नंतर 'साधुजी' करणाऱ्या लोकांना न जुमानता, सरकार व जनतेच्या सहकार्याशिवाय, छातीचा कोट करून यमपुरीच्या वाटेला संजीवन महामार्गात बदललं एका डोळस प्रेमवीरानं !

       उत्कट प्रेमाचा दरवळ पत्थराला ही पाघळवतो  हेच या प्रेमधीरानं आपल्या अदम्य कार्यानं दाखवून दिलं आहे. प्रियवराच्या थडग्यावर आत्माप्रौढीची इमारत उभारण्यापेक्षा 'इतरेजनाय सुखाय ' अशी उदात्त कार्याशिल्प उभारून आयुष्य गंध दरवळत ठेवण्याचा आदर्श देणाऱ्या या बावनकशी प्रियकरास ही शब्दफुले सादर समर्पित !

 "प्रेमफुला आठवून ...." 

येशील ना प्राणप्रिये आता तरी परतून
बघ केलाय रस्ता तुझ्यासाठी पाषाणाला हटवून ||१||

आठवणींची साजलेणी लेऊया परतून
चल शुभ्र शीडे उभारुनी जग पाहूया फिरून ||२||

शरदाच्या त्या रात्री बेधुंद जगूया प्रेमून
मुग्ध फुले वेचीत चालू हात गळा गुंफून ||३||

चाललो होतो चार पावले आणा भाका खावून
आली असती चार फळे मज प्रेमफुला बहरून ||४||

 डाव अर्धा टाकून अशी गेलीस कशी सोडून
वाटलं नव्हतं घात होईल जाशील डोळां पाणी देवून ||५||

घट्ट मिटले ओठ अन् काढला तुझा माग शोधून
घेवून घास पाषाणाचा पाऊलखुणा ठेवल्या कोरून ||६||

केली नाही तमा जरी दिलो वेडा ठरवून
कळलो तेव्हा जगा जेव्हा रस्ता गेला उतरून ||७||

गेली जरी बावीस वर्षे जी येतील ना परतून
तप्त जना तृप्त केले तुज दरवळ आठवून ||८|| 

'दशरथ मांझी' आळवितो आला जीवनभानू सांजावून
बघ 'फाल्गुनी' प्रिये एकदाच पुन्हा तशीच मान वेळावून ||९||

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

अवघड 'ज्ञानेशलेणी' !

'ज्ञानेश्वर' मराठीला पडलेलं एक अभिजात सौंदर्यस्वप्न ! अमृतालाही पैजेत हरवण्याचा जाज्वल्य मातृभाषा प्रेमाभिमान आजच्या मराठमनात ज्यांनी जागवला तो भाषादीप शिरोमणी म्हणजे ज्ञानियांचा राजा ! शतकांची सात आवर्तनं झाली तरी मराठीचा बाज ज्ञानेशांच्या पाऊलखुणांचीच वाट पुसत जात आहे.

साध्या सोप्या शब्दांनी 'ओढाळ मनाला' ओढून घेणाऱ्या बहिणाबाईपासून 'चांद्रमाधवी' च्या दुर्बोध तरीही मनाला गुंगवणाऱ्या 'प्रदेशा' ची  'संध्याकालीन' सैरभैर सैर करवणाऱ्या कवी ग्रेस यांच्यापर्यंत मराठी सारस्वतांचे 'माहेरघर' अशा ज्ञानदेवांनी आपल्या भाषा सौष्ठवाचा एक दर्जेदार नमुना म्हणून अठराव्या अध्यायाची सुरुवात ही अशी पल्लेदार, अलंकारिक, दीर्घसामासिक, संस्कृतोद्भव, वैयाकरनांना आपले 'पंडिती' डोके खाजवायला  लावणारी 'दुर्बोध' भाषामंजिरीची आठवण करून देणारी अशी केली आहे - 
  
जयजय देव निर्मळ | निजजनाखिलमंगळ | जन्मजराजलदजाळ - | प्रभंजन || १ ||

जयजय देव प्रबळ | विदळीतामंगळकुळ | निगमागमद्रुमफळ | फलप्रद || २ ||

जयजय देव सकल | विगतविषयवत्सल | कलितकाळकौतूहल | कलातीत || ३ ||

जयजय देव निश्चळ | चलितचित्तपानतुंदिल | जगदुन्मीलनाविरल | केलिप्रिय || ४ ||

जयजय देव निष्कळ | स्फुरदमंदानंदबहळ | नित्यनिरस्ताखिलमळ | मूळभूत || ५ ||

जयजय देव स्वप्रभ | जगदंबुदगर्भनभ | भुवनोद्भवारंभस्तंभ | भवध्वंस || ६ ||

जयजय देव विशुद्ध | विदुदयोद्यानद्विरद | शमदममदनमदभेद | दयार्णव || ७ ||

जयजय देव देवैकरूप | अतिकृतकंदर्पसर्पदर्प | भक्तभावभुवनदीप | तापापह || ८ ||

जयजय देव अद्वितीय | परीणतोपरमैकप्रिय | निजजनितभजनीय | मायागम्य || ९ ||

जयजय देव श्रीगुरो | अकल्पनाख्यकल्पतरो | स्वसंविद्रुम बीजप्ररो - | हणावनी || १० ||
                                       श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा 

ही आहे मराठीच्या आरंभीच्या काळातील एक परिष्कृत अवघड 'लेणी' ! इच्छुकांनी रसास्वाद घ्यावा व ' द्यावाही ' !

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

बस एक बादली पुरे

फुकुशिमाचं उदाहरण समोर असताना जैतापुरवासी आपलं चेर्नोबील होवू द्यायला तयार नाहीत कारण कोणत्याही कारणाने असो घडलेल्या अपघातानंतर मायबाप सरकार व लाल पट्टेवाली सरकारी यंत्रणा कशी वागते याचं ज्वलंत उदाहरण भोपाळच्या रूपानं देश अजूनही भोगत आहे पण सरकारही मागे हटायला तयार नाही कारण उद्याच्या अर्थव्यवस्थेच्या गाड्याची उर्जेची तहान भागवायची म्हटलं तर आपल्या पोटात ना मध्यपूर्वे सारखं 'पेटतेल' [ पेट्रोलियम ] ना मनगटात पश्चिमेची बेमुर्वत अरेरावी मग्रुरी !

आजची ऊर्जा समस्या आपण वेळीच मार्गाला नाही लावली तर आपली 'इस्मानी' कृती 'अस्मानी' संकटांना पायघड्या घालून बोलावेल. उर्जेची समस्या जाणवायला विद्वान, पंडित असायची काही गरज नाही. रोजच्या जीवनात आपण हरघडी या समस्येने पिडले जात आहोत. आपल्या साऱ्या समस्या या परस्परावलंबी, परस्परांशी संबंधित आहेत. कोणतीही एकच एक समस्या नाही तर एकातून निघणारी दुसरी, दुसरीतून तिसरी अशी समस्यांची मालिकाच आहे.

आता असं पहा -विजेची टंचाई ही आपली समस्या तिची कारणे सोडून देवू [नाहीतर विषयांतर होईल.] व त्यातून निघणाऱ्या समस्या पाहू. अगदी जाता जाता हं !

१] भारत कृषिप्रधान देश आहे. अपुऱ्या साधन सामुग्रीत वीज टंचाईची भर. परिणामी तंत्रज्ञानाचा वापर कमी. म्हणून उत्पादन, उत्पन्न कमी. उत्पादक शेतकरी वरचेवर गरीब. त्यातून आत्महत्या.......इ.इ. [पुढच्या कड्या]

२] भारताला विकसित राष्ट्र, महासत्ता व्हायचं आहे तर उद्योगधंद्यांची वाढ व्हायला हवी. त्यासाठी ऊर्जा/ वीज हवी. जी सध्या पुरेशी नाही. उद्योग कमी म्हणून उत्पादन कमी, उत्पादन कमी म्हणून व्यापार कमी, पर्यायाने अर्थव्यवस्था कमजोर इ.इ. [पुढच्या कड्या !] 

३] विकासाची उंची सेवांच्या विस्तारावर अवलंबून असते. वीज एक पायाभूत सुविधा. जिथे पायाभूत सुविधाच नाहीत तिथे विकास कसा होणार ?

[ या झाल्या सरकारी विद्वानांच्या समस्या. आता काही खऱ्या जगाच्या समस्या -

 शेती, उद्योग व कसलीही नोकरी नसणाऱ्या लोकांच्या समस्याही आहेत. जसे - लहान मुले, गृहिणी स्त्रिया, वृद्ध, बेरोजगार तरुण इ.इ..... यांच्यासाठी कार्टून, सकाळ - संध्याकाळच्या सिरीयला / मालिका, बातम्या, चित्रपट, क्रिकेटचे सामने इ.इ..... मनोरंजनाची साधने - जी समाजस्वास्थ्यासाठी खूप गरजेची आहेत- विजेविना गतप्राण होतात व आपले प्राण कंठाशी आणतात.]

आता पाषाणयुगाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची पुस्तके उघडायची गरज नाही. वीज नसलेल्या कोणत्याही खेड्यात एखादी संध्याकाळ घालवावी म्हणजे 'स्टोन एज'चा प्रत्यक्ष अनुभवच मिळेल.

यावर थोर थोर विद्वान लोक काम करत आहेत आपण बिचारे सामान्य माणूस काय करणार ? होय, करू शकतो. करायलाच हवं. कारण या जगात काही फक्त विद्वानच राहत नाहीत. आपण ही येथेच राहतो. राहायचा, जगण्याचा हक्क आहे तर जगवण्याची, जागवण्याची ही जबाबदारी आहेच.

आता बघू या एक सामान्य माणूस काय करू शकतो ते -

१५०० वाट  [watt] चा  एक घरगुती पाणी तापवायचा हिटर १ तास वापरला  तर १.५ किलोवाट ऊर्जा वापरली जाते. या एका तासात सामान्यत: तिघांचे अंघोळीचे पाणी गरम होऊ शकते.म्हणजेच प्रत्येकी २०मिनिटात एका व्यक्तीचे पाणी तापवून गरम करता येते.

भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे. त्यातले फक्त १० टक्के लोक म्हणजे फक्त १२ कोटी लोक रोज विजेच्या उपकरणांनी पाणी गरम करून अंघोळ करतात असे समजू. तर आता यावर आधारित एक गणित सोडवू.
३ लोक १ तासात १.५ किलोवाट ऊर्जा वापरतात तर १२ कोटी लोक १ तासात किती ऊर्जा वापरातील ?

अगदी सोप्पं. १२ कोटी लोक एका तासात ६ कोटी किलो वाट ऊर्जेचा वापर करतील. हे फक्त रोजचं, फक्त एका वेळेचं व फक्त आंघोळीच गणित आहे !

आता हे खरंय की भारताचा बराचसा भाग कडाक्याच्या थंडीचा आहे. वर्षभर थंड पाणी वापरता येईल का ? आजारी, रोगी, बालके,गरजू इ. लोकांनी काय करावं ? असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे प्रत्येकाने स्वत:च शोधायची आहेत.

वरच्या ढोबळ हिशोबात तरुण व असेच लोक गृहीत धरले आहेत जे वर्षाचे किमान ८-९ महिने थंड पाणी वापरू शकतील. आपण जर कधी गंगा, यमुनेच्या पाण्यात डुबकी मारली असेल तर आपल्याला थंड पाणी म्हणजे काय याचा जीवंत अनुभव मिळाला असेल. अशा थंडगार पाण्यात लोक - गरीब व श्रीमंत दोन्ही ही - धर्माच्या, कर्मकांडाच्या श्रद्धेने स्नान करत असतात. बुद्धीप्रामाण्याने आलेली नास्तिकता कधी कधी इष्ट ठरत नाही. तर कधी कधी भोळी [अंध] श्रद्धा ही एकूण मानव जातीला उपकारक ठरते. त्यामुळे अंत:प्रेरणेने थंड पाण्याच्या भीतीवर मात करता येते.

थंड पाण्यानं आंघोळ करण्यासाठी काही टिप्स -
१] शक्यतो मर्द मावळ्यासारखं पाणी थेट डोक्यावर घ्यावं. पण तब्येत, वातावरण पाहून पायापासूनही सुरुवात करता येते. पाय, घोटे, पिंडऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर याप्रमाणे खालून वर चढत्या क्रमाने अंग भिजवून ही स्नान करता येते.

२] आंघोळीपूर्वी थोडासा व्यायाम केल्यास शरीर गरम होवून थंडीची तीव्रता कमी होते.

३] किमान हाताने तरी थोडी मालीश केल्यासारखे अंग रगडून मग आंघोळ करावी.

४] जेवढा जास्त विचार करू तेवढी जास्त थंडी वाजते. कमी विचार, चटकन कृती व थंडी गायब.

५] पहिले दोन मिनिट व अंग पुसल्यानंतरचे २ मिनिट थंडी वाजल्याचा भास होतो तेवढा समजून घ्यायचा.

६] हू हू हा हा करून किंवा दातांची कटकट करून थंडीला प्रोत्साहन देवू नये.

७] थंडी शक्यतो कान, नाकाचा शेंडा, हात, पाय [व क्वचित गाल] इ. टोकाच्या भागास जास्त जाणवते.त्यांना तत्काळ गरम कपड्यांचे संरक्षण द्यावे.

थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे किरकोळ रोग दूर होतात जसे सर्दी इ. तसेच मनाची मरगळ ही जाते.
[ इथे गरम पाण्याशी तुलना करू नये.]

 तर असं हे आपलं एक बादली थंड पाणी ही अशी वाया जाणारी ऊर्जा वाचवेल, साठवेल, गरजेच्या ठिकाणी पोचवेल. ही अशी बचतीची पोच आपल्या विकासाची पोच पावती देईल. तन मन व धन याची  समृद्धी वाढेल. अशी बचत जगात मान, सन्मान वाढवते. व्यक्तीचाच नव्हे तर समाज व राष्ट्राचा विकास अशा छोट्या-मोठ्या बचती व मान सन्मानाने होतो.


मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

दंताक्षीच्या तावडीत दंतोबा

जिसने डाँटना नहीं चाहिए फिर भी जो डाँटता रहता है - वह है डॉक्टर |

[नैचरली] पेन कि वजह से जिसके पेशन्स नहीं रहते फिर भी जिसे पेशन्स रखना पडता है - वह है पेशंट |

गेल्या  काही दिवसांपासून दंतोबा दंतशूल अर्थात दातदुखीने परेशान होते. नेहमीचा जीभबाईंचा कोमल सहवास स्पर्श ही त्यांना सहन होईना. रतिरंग रात्री स्वप्नांच्या दुनियेतून खसकन ओढून आणलं तेव्हा `रात्रीचा समय सरूनी` उष:काल होत होता. फारा वर्षांनंतर तो तांबूस लाल गोळा खिडकीतून आत येताना दिसला. त्यानं आजवर एवढी वेदनांची सोबत कधीच केली नव्हती.

छोट्या दंतोबांच्या छोट्या जगात दुसरं ते कोण असणार ? आज पहाट वाऱ्या आधीच `तिनं` घेरलं होतं. असह्य हा शब्द अनुभवला खरा ! त्या असह्याचा सह्यपणा मुरवण्यासाठी सुरु झाली मग तगमग. आधी वाटलं उघड्या कानात थंड वारं गेल्यानं अर्धं डोकं, दात, घसा असं बरंच काहीबाही दुखतंय. म्हणून मग कानात कापूस घातला वरून टोपी व त्याच्यावर मफलर बांधला.

फरक  शून्य. मग लवंग तेलात कापूस बुडवून तो गोळा दातात धरला. जीभ व गालफाडांना उगीच चटके बसले. 'वेदना' ताईचा मुक्काम वाढतच होता. वैद्यराजांना दुसऱ्या प्रहरापूर्वी भेटणं शक्य नव्हतं. सवती मत्सराची मदत घ्यायचं ठरवलं. दाताची वेदना कमी व्हावी, वाटावी, भासावी म्हणून दुसऱ्या ठिकाणी नवीन वेदना - हो आभासीच का असेना पण - निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला.

 कान ओढले, केस ओढले शरीराचे जेवढे अवयव ओढता येतील तेवढे ओढले, दाबले,पिळले. वेदना आहे तिथेच आहे. मग कपाळावर टिचक्या मारल्या, हळूहळू कानशिलावर, जबड्यावर बुक्या मारल्या तरीही परिणाम शून्यच. काही मित्रांना फोन केला पण गुलाबी थंडीतली सकाळ दंतोबांच्या दातावर खर्चायला कोणीच तयार नव्हतं. वेगवेगळे खेळ खेळले. त्यानं वेदना कमी व्हायच्या ऐवजी मोबाईलची 'जानच' गेली.

आज वेळ कसा जाता जात नव्हता. आता ९ च वाजलेत. अजून १० म्हणजे १ तास बाकी होता. शेवटी कधी नव्हे तो नट्टापट्टा करत वेळ घालवला. शेकड्याच्या ५-६ नोटा अदृश्य करून वैद्यबुवांनी दातात खड्डा करून घ्यायला सांगितलं. त्यांच्या रिकाम्या पाकिटाचं गलेलठ्ठ बेडूक झाल्याचा भास दन्तोबांना  झाला.

गरीब  दन्तोबांनी ध्वनिभ्रमण करून एक 'धर्मराज' शोधले. या धर्मार्थ रुग्णभवनाने त्यांना दिलासा दिला. पण हाय ! लवकरच तिथल्या यामिनी भगिनी दन्ताविद्यालंकार विदुषीने आपल्या [वेदना] मैत्रिणीचीच साथ दिली. त्या दोघातला हा संवाद -

मऱ्हाट भाषातज्ञ दंतोबा व त्रिभाषा सूत्राचा मोकळ्या हाताने वापर करणारी दंतशास्त्री

डॉक्टर  - क्या होता है ?

दंतोबा - वो .... वो दात मे शूळ है | [ गालावर हात ठेवत दंतोबा वदळे.]

डॉक्टर  - अच्चा, तोंड उघडो. [ ठाक ठाक हातोडा चालला.]

दंतोबा -  आआ ...आआआ .....आ

डॉक्टर  - तुम्हारा दात is infected.  मतलब वो ५ नंबर का  दात मे खड्डा करणा पडेगा. 
               अगर चार बार आ सकता है तो मै आपोइंटमेंट देती. 

दंतोबा - हा, आयेंगा.

डॉक्टर  - अगले परसो ठीक साढे दास बाजे आ जाणा.  [सिस्टरला म्हणते - ] मावशी यांची नोंद करा.

दंतोबा - मदाम, खर्चा किती येईल.

डॉक्टर  - कुच नही. free of cost  हो जायेगा.

दंतोबा - आप ही करिंगी ना |

डॉक्टर  -हां

दंतोबा -आपका नाम जी ?

डॉक्टर  - दंताक्षी दातपाडे. मै इधर महाराष्ट्रकीच हुं. घाबरणा नही. 

[अगले परसो दंतोबा वेळेवर हजर. बरंच वेळानंतर त्यंचा नंबर आला.]

चिकित्सा भगिनी [नर्स] - बसा तिकडे.

[ खुर्चीची पाठ जमिनीला समांतर आहे हे पाहून सगळ्या [तरुण] दंतशास्त्रींसमोर कसे झोपावे हे न कळून दंतोबा दंताक्षीच्या खुर्चीत बसले. बऱ्याच वेळानंतर दन्तोबाकडे पाहून अचानक - ]

डॉक्टर  - अरे , उधर नाही. इसपर लेट जाव. वो डॉक्टर का जगा है. तुम पेशंट है.

दंतोबा - जी....... जी .

डॉक्टर  - चूळ भरो. हां. लेट जाव. थोडा नीचे. थोडा वर. तोंड खोलो. ये उजवा हात उपर लेवो. जबडा नीचे. अरे बाबा, तोंड नाय जबडा नीचे करो.

[ तिला डोकं की मान खाली हवी होती. दंतोबा जबडा म्हणल्यामुळे गोंधळले.]

दंतोबा - हं,.....हुं......[ दंतोबा डॉक्टरच्या सूचना व हिंदी दोघांनी गडबडले. इंजेक्शन पाहून ] ये किस लिये ?

डॉक्टर  - अब हम तुम्हारे दात मे गड्डा करेंगे | उसके लिये दर्द होगा ना ? तो इससे वो नही होगा | थोडा नम्नेस होणे पर बता दो.

दंतोबा - आ..आ ,.........आ........आआ........  

डॉक्टर  - चलो हो गया. अब दो दिन बाद आना.
         
 [दो दिन बाद........]

दंतोबा - माझी आपोइंटमेंट आहे आज.

[ दंतभगिनीने दुर्लक्ष करत कागद ठेवून घेतला.]

[ अभी बैठना पडेगा हां.  दंतोबा थोडा वेळ लागेल हं. अशी आरोळी २-३ वेळा घुमली. मागून आलेले पेशंट तपासून घेवून निघून गेले. दंतोबा बसलेलेच. दंताक्षी दोनदा कुठे तरी गायब झाल्या. दुसऱ्या वेळी दंतभगिनीने ध्वनी दूरवर पाठवून दन्ताक्षींना बोलावून घेतलं. एकट्या दन्तोबांवर कसली ही दया न दाखवता ......] 

डॉक्टर - हं चलो आ जाव लवकर. बितो जल्दी. मू उघडो. मावशी नवीन आरसा दया. थुंको. एक्स रे दया. इतना नीचे नही. थोडा उपर. हे पाणी कोणी सांडलं. राहू द्या आता जे कुच करणा है बाद मे करो. [ एकच वेळी नर्स व दंतोबा भडिमारात सापडले.] दाढी क्यू नही किया? [ दंतोबाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तोंडात सुया असल्याने बोलता ही येईना.] शेव्ह ......... शेव्ह करके नही आ सकते थे क्या ? अब मै कैसे करू ? [तोंडात जणू काही उंदीर मरून पडला आहे व तो उचलायची पाळी आली आहे अश्या पद्धतीने दोन बोटे घालत ...] अगली बार शेव्ह करके आना. [ नाराजी व अनिच्छा दाखविणारे अगम्य उच्चार जे लिपिबद्ध करता येणं शक्य नाही.]   हां हो गया बाकी का अगली बार.

दंतोबा - मदाम वो ६ नंबर मे भी थोडा पेन था.

डॉक्टर - गोळी लिख दीया है. कुच्च भी खा सकते है. बाकी उसको बाद मे देखेंगे. अब जाव.

बिचारे दंतोबा गोळ्यांचा ढिगारा व [शुद्ध] मराठी डॉक्टरच्या महान राष्ट्रभाषेचा डोलारा सांभाळत 'पेन' सहन करत पेशन्स ठेवून आहेत. शेवटी काय ? ते बिच्चारे 'पेशंट' आहेत ना !

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

इंग्रजीतील संभाव्य दोन अक्षरी शब्द

संभाव्यतेच्या [Probability]  नियमानुसार इंग्रजीत किती दोन अक्षरी शब्द तयार होऊ शकतात याची एक यादी येथे तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. [विद्वानांनी जरूर ती दुरुस्ती करावी.]

aa, ab, ac, ad, ae, af, ag, ah, ai, aj, ak, al, am, an, ao, ap, aq, ar, as, at, au, av, aw, ax, ay, az. =26


ba, bb, bc, bd, be, bf, bg, bh, bi, bj, bk, bl, bm, bn, bo, bp, bq, br, bs, bt, bu, bv, bw, bx, by, bz. =26


ca, cb, cc, cd, ce, cf, cg, ch, ci, cj, ck, cl, cm, cn, co, cp, cq, cr, cs, ct, cu, cv, cw, cx, cy, cz.=26


da, db, dc, dd, de, df, dg, dh, di, dj, dk, dl, dm, dn, do, dp, dq, dr, ds, dt, du, dv, dw, dx, dy, dz.=26


ea, eb, ec, ed, ee, ef, eg, eh, ei, ej, ek, el, em, en, eo, ep, eq, er, es, et, eu, ev, ew, ex, ey, ez.=26


fa, fb, fc, fd, fe, ff, fg, fh, fi, fj, fk, fl, fm, fn, fo, fp, fq, fr, fs, ft, fu, fv, fw, fx, fy, fz.=26


ga, gb, gc, gd, ge, gf, gg, gh, gi, gj, gk, gl, gm, gn, go, gp, gq, gr, gs, gt, gu, gv, gw, gx, gy, gz.=26


ha, hb, hc, hd, he, hf, hg, hh, hi, hj, hk, hl, hm, hn, ho, hp, hq, hr, hs, ht, hu, hv, hw, hx, hy, hz.=26


ia, ib, ic, id, ie, if, ig, ih, ii, ij, ik, il, im, in, io, ip, iq, ir, is, it, iu, iv, iw, ix, iy, iz.=26


ja, jb,jc, jd, je, jf, jg, jh, ji, jj, jk, jl, jm, jn, jo, jp, jq, jr, js, jt, ju, jv, jw, jx, jy, jz.=26


ka, kb, kc, kd, ke, kf, kg, kh, ki, kj, kk, kl, km, kn, ko, kp, kq, kr, ks, kt, ku, kv, kw, kx, ky, kz.=26


la, lb, lc, ld, le, lf, lg, lh, li, lj, lk, ll, lm, ln, lo, lp, lq, lr, ls, lt, lu, lv, lw, lx, ly, lz. =26


ma, mb, mc, md, me, mf, mg, mh, mi, mj, mk, ml, mm, mn, mo, mp, mq, mr, ms, mt, mu, mv, mw, mx, my, mz. =26


na, nb, nc, nd, ne, nf, ng, nh, ni, nj, nk, nl, nm, nn, no, np, nq, nr, ns, nt, nu, nv, nw, nx, ny, nz. =26


oa, ob, oc, od, oe, of, og, oh, oi, oj, ok, ol, om, on, oo, op, oq, or, os, ot, ou, ov, ow, ox, oy, oz. =26


pa, pb, pc, pd, pe, pf, pg, ph, pi, pj, pk, pl, pm, pn, po, pp, pq, pr, ps, pt, pu, pv, pw, px, py, pz. =26


qa, qb, qc, qd, qe, qf, qg, qh, qi, qj, qk, ql, qm, qn, qo, qp, qq, qr, qs, qt, qu, qv, qw, qx, qy, qz. =26


ra, rb, rc, rd, re, rf, rg, rh, ri, rj, rk, rl, rm, rn, ro, rp, rq, rr, rs, rt, ru, rv, rw, rx, ry, rz. =26


sa, sb, sc, sd, se, sf, sg, sh, si, sj, sk, sl, sm, sn, so, sp, sq, sr, ss, st, su, sv, sw, sx, sy, sz. =26


ta, tb, tc, td, te, tf, tg, th, ti, tj, tk, tl, tm, tn, to, tp, tq, tr, ts, tt, tu, tv, tw, tx, ty, tz. =26


ua, ub, uc, ud, ue, uf, ug, uh, ui, uj, uk, ul, um, un, uo, up, uq, ur, us, ut, uu, uv, uw, ux, uy, uz. =26


va, vb, vc, vd, ve, vf, vg, vh, vi, vj, vk, vl, vm, vn, vo, vp, vq, vr, vs, vt, vu, vv, vw, vx, vy, vz. =26


wa, wb, wc, wd, we, wf, wg, wh, wi, wj, wk, wl, wm, wn, wo, wp, wq, wr, ws, wt, wu, wv, ww, wx, wy, wz. =26


xa, xb, xc, xd, xe, xf, xg, xh, xi, xj, xk, xl, xm, xn, xo, xp, xq, xr, xs, xt, xu, xv, xw, xx, xy, xz.=26


ya, yb, yc, yd, ye, yf, yg, yh, yi, yj, yk, yl, ym, yn, yo, yp, yq, yr, ys, yt, yu, yv, yw, yx, yy, yz.=26


za, zb, zc, zd, ze, zf, zg, zh, zi, zj, zk, zl, zm, zn, zo, zp, zq, zr, zs, zt, zu, zv, zw, zx, zy, zz.=26

 या यादी प्रमाणे इंग्रजीत दोन अक्षरी शब्द २६ * २६ = ६७६ आहेत. नवीन चिन्हे वापरली नाहीत तर २६ अक्षरांचा वापर करून इंग्रजीत आता यापेक्षा जास्त दोन अक्षरी शब्द तयार होणार नाहीत. यातील बऱ्याच शब्दांना एकापेक्षा जास्त अर्थ आहेत तर काहींना काहीच अर्थ नाही. अभ्यासूंनी आपला विचार जरूर सार्वजनिक [ शेअर] करावा. 

या  यादीचे अनेकांना फायदे होतील.
     १] लेखक मंडळींना नेमके शब्द हाती लागतील.
     २] प्रकाशकांना/ मुद्रकांना शब्दांची लांबी रुंदी कळेल. शब्दांवरचा  खर्च कमी-जास्त करता येईल.

     ३] शब्दकोडे [Crossword]  सोडवणाऱ्यांना  शब्दकोडेकोश म्हणून वापर करता येईल.
     ४] इंग्रजी सुधारू इच्छिणाऱ्यांना  पाठांतरासाठी वापर करता येईल. [ लवकरच अर्थांसह वेगळा कोश    येईलच.]
      ५] भाषाशास्त्रज्ञांनाही याचा वापर करता येईल.
      ६] गणितातील संभाव्यतेच्या [Probability]  नियमांचा उदाहरणांसह अभ्यास करता येईल.
      ७] उपपत्तीशास्त्राचा अभ्यास केल्यास भाषेचा शाब्दिक अंगाने विकासात्मक इतिहासही कळेल.
      ८] शब्द वेगवेगळया अभ्यासशाखात वेगवेगळया अर्थाने वापरला जातो त्यानं तो शब्द, तो विषय, ती भाषा, तिचे व्याकरण, वापरकर्ते लोक, त्यांचे व्यवहार इ.इ. सारे समृद्ध होत जातात सगळ्याच अंगाने, अर्थाने !

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

प्राणभेदी वरदान

माणसाला खरं सुख दु:खाच्या जाणीवेत, सुखशोधाच्या अस्वस्थतेत मिळत असावं. म्हणजे दु:ख ते सुख म्हणून स्वीकारतानाच त्याचा नकार दाखवत रहायचं. असल्याच्या आनंदापेक्षा नसल्याच्या टोचणीमागे धावायचं.कुठून कुठपर्यंत न कळत. 

सगळ्यांसारखं माझं हे असं होतं असतं. जगान्त पराक्रम व त्यामुळं नाव हे असं खूप मोठं - दशरथ, महाराज दशरथ ! आजवरचा, त्रिभुवनातला, देवेन्द्रालाही मदत करणारा सर्वश्रेष्ठ योद्धा दशरथ ! सारी सुखं, सौंदर्यसुंदरीच्या रूपानं हात जोडून समोर उभी असताना मी असा गर्दगडद अंधाऱ्या रात्री एका जुनाट मचाणावर दगडी पुतळ्याच्या स्तब्धतेनं, जंगली चिरटाच्या चाव्यांनी बेजार होत, स्मशानातल्या वेताळासारखा स्वत:ला टांगून घेतल्यासारखा उभी रात्र घालवतोय कसल्या सुखाच्या प्रतीक्षेत ? माझं मलाच समजेनासं झालयं.

या भवभ्रमाच्या भोवऱ्यातही माझ्यातला शिकारी दक्ष आहे. पाऊस पडून गेल्यानं पानावरून गळत्या टीपटीपीनं नेमक्या आवाजाचा कानोसा घेणं कठीण झालंय पण त्या ताणानंच मी दुसऱ्या कुठल्या तरी टोचणीला विसरू शकत होतो. किमान तसा भास तरी निर्माण करून स्वत:ची फसवणूक करत होतो. पण त्या शिकाऱ्याला सतत ढुसण्या देणारे राजेपण, माणूसपण काही स्वस्थता मिळू देत नव्हते. उतार वयाची चाहूल लागलीय अन् तीन महाराण्या [अधिक बाकीचे ..... महाल] असूनही न मिळालेलं बापपण आणि एवढ्या पराक्रमी राज्याच्या उत्तराधिकाराचा प्रश्न एकाच वेळी भावनिक गुंतागुंत व राजकीय अस्वस्थता वाढवत आहेत.

राजाशिवाय राज्य म्हणजे वृक्षाशिवाय वेली असण्याचा असा माझा काळ अन् काळाच्या जबाबदाऱ्या. या जबाबदाऱ्याही मोठ्या खट्याळ असतात त्या मजबूत खांद्याचाच आधार शोधत फिरत असतात. एका वारुळातल्या अगणित मुंग्याप्रमाणेच जबाबदाऱ्याही मजबूत खांद्यावर दाटीवाटीनं लगडलेल्या असतात. मजबूत खांद्यावर जर जबाबदारी पार पाडण्यासाठीचं भान असणारं डोकं असलं तर मग झालंच !

 " बुडबुड बुडबुड" "सूंम्म्म्म्म्म्म्म्म खच् क" " आई गग्ग्ग्ग्ग्ग" क्रिया प्रतिक्रिया व प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया काही कळलंच नाही. शब्दभेदी धनुर्विद्येचा मी जागतिक धनुर्धर माझ्याच विचारात गुंगलो असताना पाणवठ्यावर बुडबुड असा आवाज ऐकताच माझ्या प्रतिक्षिप्त क्रिया संचालक यंत्रणेनं सरावानं बाण सोडला व  आई गग्ग्ग्ग्ग्ग ची कळ उठवून गेला. क्षणात मी उडी मारून आवाजाच्या दिशेनं धावलो. एक तरुण कळवळत होता. माझं क्षमापुराण मधेच थांबवून त्यानं म्हटलं," राजन, इथे जवळच एका पडक्या शिवमंदिरात माझे वृद्ध आई-बाप तहानेनं व्याकूळ होवून माझी वाट पहात आहेत. त्यांना एवढं पाणी द्या लवकर. अन् राजा आहे म्हणता तर त्यांची पुत्राप्रमाणे काळजी घ्या." कणभर चमकलेल्या विजेनं त्याच्या डोळ्यातली अपार वेदना अन् त्या निष्प्राण देहस्पर्शानं आलेली चेतनेची बधिरता कर्तव्यकर्माच्या भावनेनं गतिमान झाली. 

" बाळा, बोलत का नाहीस ?" चाहूल लागूनही भयाण शांतता त्या वृद्ध दंपतीस असह्य होवून बोलती झाली. मी हळूच पाण्याचं भांडं सरकवलं. " रागावलास ना ! रागव बेटा, जरूर रागव. तुझ्यासारख्या लक्षगुणी पोरानं तरी दुसऱ्या कोणावर रागवावं रे ! " आईबाप लागोपाठ बोलत होते. जणू एकच  महान कलाकार स्त्री-पुरुषाच्या वेगवेगळ्या आवाजात बोलत असावा.

 " आज आता तुला सांगितलंच पाहिजे सारं. दारिद्र्याच्या असह्य उन्हात पोळून निघताना घरावर गोकुळसुख छाया आयुष्याची संध्याकाळ होत आली तरी उगवलीच नाही बघ. कोणा एका तापसावर विश्वास ठेवून या निबिड अरण्यात आलो त्या भोळ्या शंकरावर पुत्रफळाच्या आशेने कठोर तपाची संततधार धरण्यासाठी. इथे जवळच एक पाणवठा आहे बघ. तिथूनच पाणी आणतोस ना तू तोच ! अन् शेजारचं तेच मचाण. श्वापदांपासून जीवंत राहण्यासाठी बांधलेलं. आता तितकं मजबूत आहे की नाही कुणास ठावूक. पण तेव्हा तरी मोठ्या प्रयासानं उभारलं होतं खरं. पुत्र झाला तर दर श्रावणातले सोमवार अभिषेक करायला इथंच येवू असा नवस करूनच येथेच कंदमुळे खात राहिलो बघ. हा वनवास स्वत:हून पत्करला होता. अपत्यप्राप्तीची आशा अपत्यप्राप्तीच्या वाटेतल्या साऱ्या दु:खांना सहन करायला लावते बघ."    

 "असा घुमा राहू नकोस रे राजा ! " मी दचकलो. मी गप्पच राहिलो. बोलणार तरी काय अन् कसे ? पण ते दोघं बोलतच राहिले. खूप वर्षांपासून साठलेलं गुज ते वृद्ध मायबाप आपल्या प्रियपुत्रापाशी उकलत होते. " बऱ्याच उशिरा, बऱ्याच आशेनं जन्मलेला तू आमच्या प्राणांचं बहिश्च रूपचं होतास. नवसाच्या नावाखाली आम्ही आमचं प्रेम - जे खरोखर दुरावण्याच्या भीतीचं निव्वळ दिखावू रूप होतं - तुझ्यावर थोपत राहिलो ज्यानं तुझ्या गुरुगृही जाण्याच्या इच्छांना बंदिस्त केलं. घरातचं तू बरंच काही शिकलास तरी ते पुरेसं कुठं होतं. हे कळूनही आम्ही मूक राहिलो.कारण थकलेले हातपाय, सुरकुतलेलं शरीर शारीर गरजांनाही थकवू शकत नाही ना ! श्रावणातल्या नवसाचा बाळ म्हणून श्रावण जो आपल्या सात्विक वृत्तीनं अकाली वृद्धत्वाने आपल्या वृद्ध आईबापांची मनोभावे सेवा करत आहे. जगानं हेवा करावा असं जगणं तू आम्हांला देतोयस. कळतंय आम्हांला एवढ्या रात्री पाणी आणणं किती कठीण आहे ते. एखादं श्वापद, कालसर्प टपून बसला असेल, पडल्या पावसानं बनवलेला गुडघाभर चिखल, उघड्या अंगाला बोचणारे चिरट अन् बोचरी थंडी किती अन् काय ! " ............... एक प्रदीर्घ उसासा जीवघेणी शांतता देवून गेला. 

 " एवढं सगळं कशासाठी तर तुझ्यासाठी दिल्या - घेतल्या आमच्या वचनासाठी. पण बाळा, आजचं हे शेवटचं बरं का ? आज तुला सोळावं लागलं. आपली ही तीर्थयात्रा आता थांबली हं ! आमची ही गात्रं आता खूप थकलीत रे ! कधीही हे  पिकलं पान आता गळून पडेल. पण तू असा बोलत का नाहीस. किती रागावशील बाळा ? बोल न रे !" चाचपडत्या हातानं भांडं लवंडलं अन् मला अंधारून आलं. भात्यातले सारे बाण खणखणत विखरून पडले.

 " कोण आहे ? कोण आहे तिथं ? बोल कोण आहे ? श्रावणा ! बाळा ! कुठं आहेस तू ?"  माझ्या कठोर खांद्यावर ती सुरकुतली पण मजबूत पकड रुतत होती. "आमचा बाळ कुठं आहे ? तू कोण आहेस ?"  "तुमचा .... तुमचा बाळ .... मी.... मी राजा ... " आयुष्यात पहिल्यांदा दशरथाची वाचा अडखळत होती. " मी राजा दशरथ शिकारीसाठी पाणवठ्यावर श्वापदांची वाट पहात होतो. इतक्यात तुमचा बाळ तेथे आला अन्  माझ्या शब्दभेदी बाणानं ......"

 " देवा ! " सारा आकांत नंतरच्या भयाण शांततेनं विस्फोटीत केला. इतकी असह्य तगमग त्या अंधुक उजेडात माझे प्राण कंठाशी आणत होती. "बाळा,बाळा" पुटपुटत म्हातारी प्राण बाहेर टाकण्यासाठी की आत धरून ठेवण्यासाठी सारं शरीर आखडत तगमगत, तडफडत होती. प्राणजात्या मुलाला दिलेल्या वचनाला जागूनही मी त्या वृद्ध मातापित्यांची पुत्राप्रमाणे काजळी घेऊ शकत नव्हतो. राजा म्हणून तर दूरच राहो.  

"मला क्षमा करा." माझा हात झिडकारत पत्नीच्या त्या निष्प्राण कुडीला कुरवाळत तो सुरकुतला आवाज शापवाणी बरसून गेला, " आमच्यासारखाच तूही राजा, असाच पुत्रवियोगानं तगमगत, तडफडत प्राण देशील ! " मस्तकावर वीज कोसळावी तसा अंतर्बाह्य हादरून गेलो मी. अन् म्हाताऱ्यानंही मान टाकली काही क्षणातच. तीन मृत्यू इतक्या लवकर, इतक्या जवळून माझ्याचमुळे. 

 पुढं काय केलं काय घडलं फारसं काही आठवतंच नाही. मृगया सुटली की सोडली कळलं नाही. राजकर्तव्य चालूच होती बोचणीच्या टोकावर. वसिष्ठांनी यज्ञ मांडला. बरंच समुपदेशन केलं. "शाप खरा व्हायला आधी पुत्र तर हवा. म्हणजे तो शाप नसून वरदान आहे राजन. दीर्घायुष्य व पुत्रप्राप्तीचा आशीर्वादच जणू ! "

 हळू हळू चित्तवृत्ती पालवल्या. मनवसंत पुन्हा बहरला. राम, लक्ष्मण, भरत अन् शत्रुघ्न तीन महालातले चार चंद्र माझ्या मनाला आपल्या बाललीलेनी रंजवू लागले. पण सल कायम होती. सुकुमार राम - लक्ष्मणाला विश्वामित्रासोबत धाडताना ती पुन्हा उफाळून वर आलीच. गुरुगृही जाण्याची परंपरा, जनमानस, मंत्रीगण,कैकयी, वसिष्ठ,विश्वामित्र, प्रत्यक्ष राम-लक्ष्मणाची इच्छा यामुळं मला मन आवरावं लागलं. तसा त्यांचा आश्रम जवळच होता. तरी मन खुरडतच होतं.


काळ जातच होता. जातच होता. अन् मन बेटं किंचित सुखावत होतं. पण ........... 

पण  आजची गोष्ट काही निराळीच होती. या राजकारणाच्या निमित्तानं ते प्राणभेदी वरदान आपली वेळ साधू पाहत होतं. राजाचं कर्तृत्त्व, कर्तव्य, प्रजेचा विकास व सुख-सुविधा यासाठी रामानं आकाशाला गवसणी घालणं गरजेचं होतं.त्याचं `रामपण` सिद्ध व्हायला दक्षिण-दक्षिणा मिळवायलाच हवी पण ती काळीजकातरी तगमग थांबत का नाही ? राजकारणातल्या नाटकातला मी एक नटसम्राटाची भूमिका वठवतोय की जीवनसंग्रामातला मी एक वठलेला बाप बनत चाललोय काही कळत नाही. हात पुन्हा पुन्हा छातीकडेच जातोय वाचा राम, राम याशिवाय कश्यातच रमत नाही. राजवैद्यांना नाडी, श्वास, डोळे, ऊर्ध्व लागत आहेत.

पण  माझे मलाच कळतंय की खरोखर प्राणच आता ऊर्ध्व लागले आहेत.
 

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

एका दाण्याचे अर्थशास्त्र

'भूकेला कोंडा अन् निजेला धोंडा' अशी एक म्हण आहे. तिचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही अर्थ आहेत. सकारात्मक अर्थाने निस्पृहाचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. भूकेला कोंडा अर्थात जेवणाची आसक्ती नसावी [एवढाच व असाच अर्थ घ्यावा कोंड्याचे अथवा कोंड्यासारखे निसत्त्व जेवण जेवावे असा घेवू नये.] निजेला धोंडा अर्थात शारीर सुखांची फार फिकीर करू नये. उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही असे नाही पण झोपताना डोके थोडेसे उंचावर असावे यामागे शरीरशास्त्राचा आधार आहे म्हणून धोंड्याची / दगडाची उशी ही चालेल इतकेच.[कधी बौद्ध लेण्या,विहारात गेल्यावर बारकाईने पहा दगडाचीच उशी, पलंग दिसेल झोपायची व्यवस्था म्हणून !]

आता नकारात्मक अर्थ पाहू - अत्यंत दारिद्र्याचे, गरिबीचे वर्णन करताना या म्हणीचा वापर करतात. कोंडा अर्थात टाकून देण्यालायक सत्वहीन पदार्थ जेवायला व धोंड्याची उशी झोपायला. आहार आणि निद्रा या अनिवार्य गरजाही ज्यांना पुरवता येत नाहीत अशांचं वर्णन या म्हणीने अत्यंत समर्पकपणे केले आहे.

आज हे आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात घडलेल्या दोन घटना ! जगातल्या सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या तशाच बलाढ्य अशा एका उच्च पदाधिकाऱ्याने म्हटलं की जगात अन्न टंचाई जाणवतेय, महागाई वाढतेय कारण भारतीय [यासोबत आफ्रिका व आशिया खंडाची नावे आहेत] लोक खूप खातात. [ खूप खाल्याने लट्ठपणा ही ज्यांची राष्ट्रीय समस्या बनतेय त्यांची ही मुक्ताफळे बरं का ! ]  

दुसरी घटना - मा.सर्वोच्च न्यालायाचे पाय मुर्दाड सरकारला लाथा घालून थकले पण लाखो टन अन्नधान्य गोदामात सडून गेले तरी सरकारला खरे गरीब कोण ते सापडले नाहीत. सरकारच्या तांत्रिक समस्या लक्षात घेतल्या तरी ही बाब समर्थनीय नाही की अपुरी यंत्रणा, अधिकारी व लोक यांच्या संगनमताने होणारा भ्रष्टाचार या कारणांमुळे अन्नधान्य  वाटप न करता ते चक्क सडू द्यावे.

कोणत्याही निकषाने शोधले तरी आज रोजी भारतात कमीत कमी २० कोटी लोक तरी निश्चितच गरीब सापडतील ज्यांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही.[अंगभर कपडा व पुढच्या किमान गरजांची तर बातच सोडा.] आता आपण काही अर्थशास्त्रज्ञ नाही त्यामुळे खूप काटेकोर व पुस्तकी आकडेमोड न करता वरवरचा हिशेब करू.

भारतात १२० कोटी लोक आहेत. ज्या किमान २० कोटींना दोन वेळचं पोटभर जेवण मिळत नाही ते एक वेळ कोरभर काहीतरी खावून जगत आहेत.त्यांच्या एका जेवणाची ते काळजी घेतच आहेत. आपण त्यांच्या दुसऱ्या जेवणाची चर्चा करू.

प्रत्यक्ष भारतीय भूमीवर खाणारी तोंड १०० कोटी त्यातले ७५ कोटी नवजात शिशू, बालके, आजारी लोक,  उपवास करणारे कर्मकांडी, मांसाहारी, फास्टफूडवाले, अन्य काही कारणाने भात न खाणारे सोडून देवू. उरले २५ कोटी जे रोज दोन वेळा भात खातात असे मानू कारण भात भारताचेच नव्हे तर एकूणच मानव जातीचे मुख्य अन्न आहे.

आता रोज दोन वेळा भात खाणारे २५ कोटी लोक एकावेळी फक्त एक भाताचं शीत किंवा दाणा वाया घालवतात असं समजू. म्हणजे २५ कोटी दाणे वाया जातात. गृहीत धरा एका किलोत ५ लाख दाणे असतात. तर २५ कोटी दाण्यांचे  किती किलो तांदूळ होतील ? [२५ कोटी भागिले ५ लाख = किती ? २५,००,००,००० / ५,००,००० = ५०० ] २५ कोटी दाण्यांचे  ५०० किलो तांदूळ होतील. म्हणजे ५ क्विंटल किंवा १०० किलोचे एक पोते धरले तर ५ पोते होतील.

प्रत्येकी २०० ग्राम धरल्यास एका किलोत ५ माणसे जेवतील. ५०० किलोत २५०० लोक जेवतील. हा हिशेब फक्त एका वेळचा आहे. दोन वेळचा धरल्यास ५००० लोक जेवू शकतील. जर २५ कोटी लोकांनी दर दिवशी फक्त दोन दाणे वाया घातले नाहीत तर ५००० लोक जेवतील. एका वर्षात ५००० * ३६५  = १८,२५,००० [अठरा लाख पंचवीस हजार ] लोक जेवू शकतील. पाहिलीत एका दाण्याची शक्ती !  

हे झालं घरच्या जेवणाचं. बाहेरच्या जेवणातली उधळपट्टी तर कहरच आहे. बाहेरचं जेवण दोन प्रकारचं एक- स्वत:च्या पैशांनी , दुसरं - पार्टी, लग्न इ. समारंभातलं. हॉटेलात कोणी घरच्यासारखं ताट, वाटी, भाजीची प्लेट इ.तील सर्व पदार्थ संपवत नाहीत.[ किमान लेखकाचा तरी प्रत्यक्ष तसा अनुभव आहे.] कारण तसं करणं भिकारपणाचं दिसतं [म्हणे!]. वेटरला टीप दिल्यासारखं लोक बरेच पदार्थ ताटात तसेच ठेवतात. याची खात्री करायची असेल तर कोणत्याही लहान मोठ्या हॉटेलच्या मागच्या मोरी,गटाराचे निरीक्षण करावे.

आता एका वेळी एक व्यक्ती एक ग्राम खाद्यपदार्थ वाया घालवत असेल व संपूर्ण भारतात रोज असे फक्त एक लाख लोक असतील तर एक लाख ग्राम खाद्यपदार्थ वाया जातात म्हणजे १०० किलो अन्न वाया जाते. म्हणजेच किमान ५०० लोक जेवायचे पदार्थ वाया गेले.

असाच हिशेब पार्टी, समारंभात दिसून येतो. आपली श्रीमंती दाखविण्यासाठी लोक खूप पदार्थ करतात. अन्न संस्कृतीचा संस्कार नसल्यानं लोक काहीही कारण नसताना, अगदी वाह्यातपणे अन्न टाकून देतात. पुन्हा सोपा हिशेब करू. १ ग्राम अन्न, १ लाख लोक वाया घालवतात. म्हणजेच १०० किलो अन्न -जे ५०० लोकांची भूक भागवू शकले असते- वाया जाते.

हा झाला खाण्याचा अगदी वरवरचा हिशेब. आता जरा पिण्यावर बोलू. फक्त एकच उदाहरण घेवू. परम प्रिय चहा. बरेच महाभाग कटिंगचाही खालचा भाग सोडून देतात. त्यात चहापत्ती असते हा भाग वेगळा.पण चहापत्ती देणारा चहा तुम्ही पैसे खर्चून घेताच कशाला ? म्हणजे स्व:तचे पैसे देवून कमी चहा प्यायचा. चहा प्यावा की नको हा अजून वेगळा विषय आहे. किमान पैसे देवून वाया तरी घालवू नका ना !

समजा एक व्यक्ती एका वेळी १ मिली चहा वाया घालवते.[चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय आहे म्हणून ] किमान ५० कोटी लोक १ मिली चहा वाया घालवतात असे गृहीत धरले तर ५० कोटी मिली चहा वाया जातो.म्हणजेच ५ लाख लिटर चहा वाया जातो. या चहा सोबत साखर, दूध, चहापत्ती, पाणी, पैसे,वेळ  इ. ही वायाच जाते. 

वरील अन्न व पेयासोबत ऊर्जाही वायाच जाते. याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. हा कचरा पर्यावरणास हानीकारक होतो ते वेगळेच. आता हे खरे आहे की या अन्नपदार्थांची विशेषत: चहाची आपली अशी एक अर्थव्यवस्था आहे  पण ती बऱ्याच अंशी विघातक ही आहे.

वाया घालण्याच्या आपल्या या विघातक सवयीला पायबंद बसला पाहिजे. समारंभातल्या खर्चावर, अन्नाच्या उधळपट्टीवर जगभरातील सरकारांनी कायदेही केले आहेत. पण सगळ्याचं गोष्टी कायद्याने कुठं होतात ? जनामनाची समज वाढल्याशिवाय ही अर्थहीन, अंतिमत: विनाशक उधळपट्टी थांबणार नाही.

पृथ्वी पूर्वी प्रमाणेच भरपूर अन्न देत आहे. गरज आहे ती समान वितरणाची. ढिम्म सरकार हालो तेव्हा हलो. अन्न किती खावं हा पुढचा विषय आहे. कसं खावं हे तर सोप्पं व साधं आहे. निस्पृहाच्या अर्थाने जरी नसलं तरी गरीब भूकेल्यांच्या भूकेचा कोंडा दूर करण्यासाठी खूप काही करायची गरज नाही. फक्त आपला एक दाणा वाचवला म्हणजे झालं.

रविवार, २५ डिसेंबर, २०११

साहेबाची भाषा

 भाषा आपल्या भावभावना इतरांपर्यंत पोचवायचे एक माध्यम आहे. मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी भाषा एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यत: भाषेचे मातृभाषा व परभाषा असे दोन प्रकार करता येतात. मातृभाषा आपण जगत असतो.त्यामुळे तिचा वेगळा अभ्यास करायची गरज लक्षात येत नाही.परंतु पराभाषेचे आपले असे महत्त्व असते.

एखादी परभाषा एखाद्या प्रदेशात बोलली जाण्यात बऱ्याचदा आक्रमण, गुलामगिरी,व्यापार, मनोरंजन अशी बरीच कारके महत्त्वाची ठरतात. मराठी आणि अन्य भाषा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पण सहज उल्लेख केला तर  -
१] जननी भाषा म्हणून संस्कृत,
२] धार्मिक चळवळींची भाषा म्हणून अर्धमागधी [जैन] व पाली [बौद्ध],
३] आक्रमक म्हणून
       अ] अरबांची अरबी,
       आ] इराण्याची फारसी,
         इ] पोर्तुगीजांची पोर्तुगीज     
४] अरबी,फारसी व भारतीय भाषांची मिश्रित उर्दू
५] मराठ्यांच्या वाढत्या विस्ताराने कन्नड, मलयालम, तमिळ,तेलुगु, उडिया,बंगाली, हिंदी, राजस्थानी, गुजराती इ.

 या भाषांचा मराठीशी आलेला, येत असलेला संबंध आपल्या रोजच्या जगण्याचा व भाषेचा व्यवहार बदलत असतात. यात सर्वात प्रमुख भाषा म्हणजे साहेबाची भाषा - इंग्रजी होय.

 आपली इच्छा असो वा नसो आज [किमान भारतात] तरी इंग्रजी भाषा जीवन जगण्यातला एक अनिवार्य टप्पा ठरत आहे. बहुभाषिक असणं एका विकसित व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे. कोणतीही भाषा चार टप्प्यांनी आत्मसात करता येते.
१] श्रवण  - लक्षपूर्वक व समजून घेवून ऐकणे.
२] भाषण  - इतरांना समजेल असे अर्थपूर्ण बोलणे.
३] वाचन - समजून घेवून वाचणे.
४] लेखन - इतरांना समजेल असे लिहिणे.

इंग्रजीच्या संदर्भात आपण बर्याचदा व्याकरणाच्या पुस्तकापलीकडे जात नाही. आपली इंग्रजी एक व्याकरणाचे पुस्तक [ सर्वप्रसिध्द तर्खडकर आणि  रेन व मार्टीन (Wren & Martin) ] अन् एक बऱ्यापैकी शब्दकोश या दोन चाकावर चालत असते. यात गैर काही नाही. या [दोन] मजबूत पायामुळेच भारतीय लोक जगात सर्वात जास्त चांगले व शुद्ध इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी एक मानले जातात. एक वेळ खुद्द इंग्रज चुकीचं बोलेल पण खरा भारतीय आंग्लभाषी कधीच चूक इंग्रजी बोलायचा नाही. यामुळे मातृभाषेप्रमाणे लालित्यपूर्ण इंग्रजी जरा मागे राहून जाते असे वाटते.

या स्तंभात इंग्रजी भाषेतील शब्दांचा खजिना शब्द-परिवार [Word Family]  या प्रकाराणे सजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

पायतानापासनं सुरुवात

'उफाड्याचा माल ते मातृदेवो भव मार्गे लीलासहधर्मचारिणी' इतक्या विस्तृत प्रतलात स्त्री पुरुषाच्या आयुष्याला व्यापून राहते. या स्तंभात एक मैत्रीण - हो, कोणत्याही विशेषणाशिवाय फक्त मैत्रीण - व फार झालं तर एक प्रेमळ जीवनसाथी एवढाच विस्तार अपेक्षून 'लेखनप्रपंच' केला जाईल. 

सामान्यत: मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण येवू लागलं की व्यक्तीच्या लैंगिक भावनांचा विकास सुरू होतो. [याला अपवाद असू शकतो.] शरीरशास्त्र याला पौगंडावस्था म्हणतं. येथे आपण या कालाचा विचार करणार नाहीत तर या पुढच्या अवस्थेचा म्हणजेच तारुण्याचा विचार करणार आहोत.

तर महाराजा, आता आपण तरूण सुंदरी कशी आपलीशी करावी ते पाहू. [ पोरगी पटवायचे हे तोडगे प्रामाणिकपणे केल्यास एकापेक्षा जास्त पोरी मागे लागतील हा सावधगिरीचा इशारा देवून आम्ही सुरुवात करीत आहोत. ]

सामान्यपणे  कोणतीही पोरगी कोणाही पुरुषाच्या नजरेला नजर देत नाही तर एका नजरेत त्याला वरपासून खालपर्यंत पाहून आपली दृष्टी जमिनीकडे वळवते. याचा अर्थ असा नव्हे की ती तुमच्याकडे पहात नाही. डोळ्यांच्या कडातून नजरेची बंदूक नेम धरून उभी असते बरं का !

व्यक्ती म्हणजे काही पुतळा नाही. अंतर्बाह्य अभिव्यक्ती म्हणजेच जीवंतता होय. आता अडचण अशी की ही आंतरिक सुंदरता एका नजरेत दिसत नाही म्हणून आधी दृश्य शरीराच्या सौन्दर्यापासून सुरुवात करू. सार्वजनिक ठिकाणी चेहरा व हात वगळता सारं शरीर कपड्यातच बंदिस्त असतं म्हणून आपल्या सुंदरतेचे बरेचसे गुण कपड्यांनाच जातात.संपूर्ण वेशभूषेमध्ये पादत्राणांचा ही समावेश होतो.

आता जर पोरगी नजरेला नजर न देता पायाकडे पाहत असेल तर ? ......... तर महाराजा, चांगली वहाणे वापरावीत दुसरं काय ! [ विक्टोरियन काळात पियानोचेही नागवे पाय झाकले जायचे. तुम्ही तर चक्क एकविसाव्या शतकातील पुरुष आहात की राव ! ] पायतानं चांगली  म्हणजे महागडी नव्हेत. नायके किंवा रिबॉकचेच बूट हवेत असे नव्हे. बूटच हवेत असेही नव्हे. किंवा नेहमीच कोल्हापुरी चप्पल असावी असे ही नव्हे.  

आज पाय कशातही न घालता किंवा पायात काहीही न घालता कोणी फिरत नाही. विशेषत: जिथे पोरी पाहतील अशा ठिकाणी तर नाहीच नाही. [ म्हणजेच कॉलेजात, रस्त्यावर, ट्युशनला इ.इ.] मग मूळ मुद्दा पायतानं हा नाही. ती असावीत व ठीकठाक असावीत एवढेच ! 

मंग महाराजा, पोरगी  पटावी कशी ? तर राजे हो, पोरगी तुम्ही पायतान कसलं घालता याच्यानं नाही पटत तर घातलेलं पायातन कसं वापरता अन् वापरून झाल्यावर कसं सोडता, ठेवता याच्यानं तुमच्यावर मरते. जरा आपलं पायतान [ यात चप्पल, बूट इ.इ. सारं आलं.] काढून त्याचा तळ पहा. घासलेल्या टाचेवरून स्वभाव ओळखायचं एक शास्त्र आहे म्हणे ! आपल्या घासलेल्या टाचेवरून आपला स्वभाव ओळखा. डावीकडचा भाग जास्त घासला आहे की उजवीकडचा ? दिडक्या, पाऊण चालीनं संपूर्ण तळ न घासता विशिष्ट भागच घासला जातो. असं चालणं चुकीचं आहे व ते मुलींना बिलकूल आवडत नाही. तुमच्या पायतानाचा  संपूर्ण तळ जर सगळीकडे समान घासला जात नसेल तर तुमच्या चालण्यात व कदाचित पायातही दोष आहे. असा लंगडा घोडा शर्यत कशी जिंकणार ?

आता या बाबीकडं दुर्लक्ष केलं तरी पोरगी अजूनही उंबरठ्यातच आहे असं समजा. तिला जर मनमंदिरात आणायचं असेल तर आपण पायतान कसं सोडतो ते जरा पहा. पायतान सोडण्यापूर्वी ते घातलेलं असलं पाहिजे. म्हणून आधी पायतान नीट घाला व नीट चाला.  

बऱ्याच जणांना पाय फरफटत, पाय घासत चालायची सवय असते त्यामुळे चालताना पायतानांचा आवाज होतो. ते बरोबर नाही. अर्ध्या चपलेतच पाय ठेवून काही जण चालतात. हेही बरोबर नाही. पायाला घट्टे पडतील अशी घट्ट पायतानं नसावीत. बुटाचे बंद नीट बांधलेले असावेत. ते लोंबणारे नसावेत. सैन्डलचे पट्टे व्यवस्थित बांधलेले,लावलेले असावेत.

पायतानं  जशी नीट घालावीत तशी ती नीट सोडावीत.बंद बांधलेले असतानाच बुटातून पाय काढणारे विद्वान ही आहेत. ते काही विद्वत्तेच लक्षण नाही. बंद सोडून बूट काढावेत. पादत्राण कोणतंही असो  ते एका शेजारी एक असं एका बाजूला आडव्या ओळीत किंवा उभ्या रांगेत किंवा पायठेवतान [ पादत्राणे ठेवायचे लाकडी वा लोखंडी कपाट] जे जसे उपलब्ध असेल तसे ठेवावे. पुढे मागे, आडवे तिडवे, तिरपे असे कसे ही सोडू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दारातच, उंबरठ्यातच  अशी कुठेही आपली पादत्राणे सोडू नयेत. 

दाराबाहेर  एका बाजूला, एका ओळीत सोडलेली पादत्राणे घरादाराची तशीच मनाची ही सुंदरता वाढवतात. घाई गर्दीच्या वेळी नेमक्या ठिकाणी कमी वेळात सापडतात. योग्य प्रकारे वापरल्यास पायतानं दीर्घकाळ टिकतात. त्यांच्याशी घसट वाढली की त्यांचा घसारा कमी होतो. अर्थव्यवस्था बचतीची बढती दाखवते. अशा वाचलेल्या पैशातून सिनेमाची दोन  तिकीटं, मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फूल, दोघात शेअर करता येईल असा कटिंग चहा किंवा मलईदार नारळ किंवा.......किंवा........ असं बरंच काही येवू शकतं. 

दारासमोर 'सुंदर रांगोळी काढणारी कोणी एक' दारा आत हवी असेल तर सुंदर घरादारासोबतच ..... सुंदर मनाची ही  गरज असते असं सुंदर मन सजग प्रामाणिकतेनेच निर्माण होतं. अशी सजगता पायतानं नीट काढल्या-घातल्यानं वाढते. 

पोरीवाहो, गळयाच्यान सांगा बरं असला मैतर तुम्हाला नको का ?

[.......... आता अशा जातीच्या सुंदराला कोणती सुंदरी नाकारील बरं ? ]

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

मराठीतले एक अक्षरी शब्द

येथे मराठीतल्या एक अक्षरी शब्दांची यादी दिली जात आहे. ही यादी परिपूर्ण असेलच असे नाही. कृपया वाचकांनी यादी पूर्ण करावयास सहकार्य करावे.

१] अ = मराठीतील सर्व प्रथम स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द  म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

२] आ = मराठीतील दुसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत आ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

३] इ = मराठीतील तिसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत इ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो

४] ई = मराठीतील चौथा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ई हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

५] उ = मराठीतील पाचवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत उ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

६] ऊ = मराठीतील सहावा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. ऊ केसांत राहणारा जीव आहे.माणसात उवा [या अनेकवचनाचा उच्चार 'वा' असा ही केला जातो.]  होतात. तशाच त्या माकडासह इतर काही केसाळ प्राण्यातही होतात. वचन = एक ऊ, अनेक उवा. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऊ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

७] ए = मराठीतील सातवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. एखाद्याचे लक्ष वेधणे, हाक मारणे, बोलावणे, संबोधन, पतीने आपल्या पत्नीला हाक मारण्यासाठी इ. साठी याचा वापर करतात. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ए हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

८] ऐ = मराठीतील आठवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऐ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

९] ओ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. हाकेला ओ देणे, प्रतिसाद, संबोधन, उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होतो. दीर्घ उच्चारीत ओ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१०] औ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. होय या अर्थाने हाव असा उच्चार करता करता औ असा ही उच्चार करून प्रतिसाद दिला जातो. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत औ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

११] अं = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अं हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१२] अः = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. वेदना दर्शक व इतर उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अः हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

सामान्यत: उद्गारवाचक शब्द अर्थाच्या दृष्टीने सापेक्ष असतात कारण कोणती व्यक्ती कोणत्या कारणासाठी कोणत्या वेळी कोणता ध्वनी अर्थात उद्गार काढेल हे काही सांगता येत नाही. एकाच उद्गाराचे वेगवेगळया कारणांमुळे वेगवेगळे अर्थ होतात. उद्गार व्याकरणाच्या नियमांना बघून निघत नाहीत. त्यामुळे कोणताही ध्वनी जो उत्स्फूर्तपणे काही तरी व्यक्त करतो, कोणती न कोणती भावना प्रकट करतो तो उद्गारवाचक शब्द असू शकतो. या अर्थाने प्रत्येक वर्ण - स्वर व व्यंजन - उद्गारवाचक शब्द असू शकतो.



सोमवार, १२ डिसेंबर, २०११

प्रबुद्ध कृष्ण - काही छटा

'संत' या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे - संत म्हणजे 'संबुद्ध तरुणता' ! संबुद्धता तारुण्याच्या कालजयी उत्साहाने वावरू लागली, की अमर 'अभंग' संतवचने अवतरतात. त्यातीलच एक म्हणजे -
" अंतरी निर्मळ वाणीचा रसाळ | त्याचे गळा माळ असो नसो |"
 यालाच मी 'प्रबुद्ध कृष्ण' म्हणतो.

अंतरीचे निर्मळत्व म्हणजे प्रबुद्धत्व ! खरे तर निर्मळ हा शब्द नकारार्थी आहे पण येथे तेच गरजेचे आहे. मळ, मलीनत्व काढून टाकणे ही प्राथमिक व अनिवार्य पायरी आहे  कारण एकदा का मालिन्य निघून गेले, की मग जे काही उरते ते शुद्ध, बुद्ध, सत्त्व अस्तित्त्व ‘असते जरी त्याला तत्वज्ञान्यांनी 'शून्य' म्हटले असले तरी !

असे पहा, की आपण एक खूप जुना किंवा खूप मलीन असा दिवा घेतला व त्याला घासून पुसून निर्मळ केले तर काय होईल ? मूळ धातू चकाकू लागेल ना ! आपण फक्त धातू वरील धूळ काढून टाकायची आतली स्वच्छता सुंदरता आपोआप दिसू लागेल. येथे नवीन काही निर्माण करायचे नाही. नवी कल्हई नाही, नवा धातू नाही, नवे मूलद्रव्य नाही ! काही काही नाही. फक्त वरचा अज्ञानाचा थर बाजूला करायचा की आत ‘अस्तित्त्व’ आहेच ! किती सोप्पं काम आहे ना ! पण हे निर्मळ करणं म्हणजे प्रबुद्धत्व नाही महाराजा ! ही क्रिया हे तंत्र आहे तत्व नव्हे. क्रियेचा परिणाम हे तत्त्व आहे. निर्मलीनत्त्व म्हणजे बुद्धत्त्व !

'दिव्याचा' मूळ धातू, रंग - रूप, स्वभाव जो नित्य, कोणत्या ही बंधनाने रहित असा आहे, स्वांतमग्न स्वानंद आहे तो  म्हणजे मूळ भाव, ते मूलतत्व हे आपले साध्य आहे. ते 'तत्' आहे. अंतस्थ दिव्याला साफ,निर्मळ करण्याची क्रिया म्हणजे तंत्र ही पहिली पायरी तर त्या साफसफाई नंतर जे मूळ सत्व उरते, दिसते, असते ते म्हणजे मूलतत्व हे अंतिम साध्य होय. हे तत्व बाहेरून थोडेच आणावे लागते ? ते तर आतच असते. फक्त दार उघडायची खोटी की प्रकाशाने  सारे घर उजळून निघालेच. हे आपले  मूळ सत्व म्हणजेच दिव्यत्व ! हे आपले  मूळ सत्व म्हणजेच बुद्धत्व ! प्रकृतीच्या  या मूळ चेतनेलाच मी 'प्रबुद्ध' म्हणतो.

प्रबुद्धत्वाची ही अवस्था खूप व चिरस्थायी आनंदाची आहे असा अनुभव ज्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली त्यांचा आहे. हा आनंद प्रत्येकाला घेता येतो. नव्हे नव्हे तो त्याचा अधिकार आहे.ते प्रत्येकाचे जीवन ध्येयच आहे. का म्हणून आम्ही आनंदात राहायचे नाही ? का म्हणून आम्ही निराशेत, दु:खात राहायचे ? बिलकुल नाही. आनंद हा जगण्याचा मूलाधार आहे. तो आम्ही प्राप्त करून घेणारच घेणार ! आम्ही प्रबुद्ध होणारच होणार !

आता  हा आनंद, प्रबुद्धपण कसे मिळवायचे ? त्याचे अनेक मार्ग आहेत. आपापल्या आवडी निवडीवर, परिस्थितीवर ते अवलंबून आहे की कोणी कोणता मार्ग निवडायचा. सर्वात सोपा, सर्वाधिक लोकांनी वापरून सिद्ध केलेला, खूप खूप प्राचीन तरीही  आधुनिक असा मार्ग म्हणजे डोळे ‘उघडे’ ठेवून पहायचा मार्ग. नुसतं पाहणं नाही तर विशेषत्वाने पाहणं म्हणून वि + पश्यना. विपश्यना ही पद्धत सार्वकालिक, सार्वभौमिक, सार्वदेशीय तर आहेच शियाय सजीवाच्या - श्वास घेणाऱ्या सर्व सजीवांच्या - अस्तित्वाइतकीच आदिम व प्रत्येक श्वासाइतकीच प्रासंगिक ही आहे. ही पद्धत किंवा अशा पद्धती वारंवार जगाला आठवण करून देणाऱ्यांनाच ऋषी, बुद्ध, प्रेषित म्हटलं गेलं ते त्यांनी त्या पद्धती स्वत: वापरून बुद्धत्व प्राप्त केल्यामुळंच !

या परंपरेतला सर्वात प्रसिद्ध बुद्ध म्हणजे ‘सिद्धार्थ गौतम’ ! आपल्या अस्तित्वानं बुद्धत्वाचा अर्थ सिद्ध करणारा ! प्रबुद्ध या शब्दानं त्या सिद्धार्थ गौतमाची आठवण होत असेल तर ठीक पण मला व्यक्ती नव्हे तर त्याचे कार्य व त्या मूळ सत्त्वाची आठवण होते म्हणून पहिला शब्द ‘प्रबुद्ध’ !

पहिला शब्द अंतस निर्मळ करण्याकडे लक्ष वेधतो व त्याची एक पद्धत संकेतानं सांगतो, की बाबा रे ! या नावाच्या या माणसाच्या मागे मागे – अनुयायी म्हणून नव्हे तर सहप्रवासी म्हणून – गेलास तर तुही तेथेच पोहोचशील जेथे जायचं आहे.

दुसरा शब्द कृष्ण ! येथे मला तो महाभारती कृष्ण अपेक्षित नाही. जो आकर्षून घेतो तो कृष्ण ! शरीर व मनाला जे जे आकर्षित करतं ते ते सारं कृष्ण ! ‘ते’ बुद्धत्व साऱ्यांनाच आकर्षित करत असतं म्हणून ते कृष्ण आणि त्याचा आकर्षिण्याचा गुणधर्म म्हणजे कृष्णत्व ! ज्यांनी ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे त्यांनी त्यांनी साऱ्या जगाला आकर्षित केलं आहे पण आकर्षिणारं ते ते सारं बुद्धत्व नव्हे !

आकर्षित्व अनेक प्रकारांनी दिसून येतं. माझं आकर्षित्व हसतं, खेळतं, नाचतं, गातं, नांदतं आहे. त्याची धीरगंभीरता मंदस्मिता इतकचं खळाळून हसण्यानं भारीत आहे. त्याचं ‘असणं’ आनंदाची धाराप्रवाहिता वृद्धिंगत करणारं आहे. ते नुसतंच गोड नाही तर त्याला नवरसमंजिरीची रसाळ साथ आहे.  

अंतस निर्मळ झाले की वाणी आपोआपच रसाळ होतेच होते. महान वक्ते आपलं बोलणं विविध रसांनी कर्णमधुर बनवतात पण ते तेव्हापर्यंतच गोड वाटते जोवर ते वक्ते व्यासपीठावर उभे असतात. त्यांच्यातला वक्ता लाखोंना भारून टाकतो पण त्यांच्यातला माणूस किती लोकांना आकर्षित करेल हे सांगता येणं कठीण आहे. वाणी ही फक्त जीभेद्वारेच व्यक्त होते असं नाही. संपूर्ण तना - मनाने जे जे व्यक्त होतं, होऊ शकतं ते ते सारं वाणीचं वक्तव्यच असतं.
श्रोत्यांच्या कानांना संमोहित करणं त्यामानानं सोपं आहे पण आत्म्यांना भारीत तेच करू शकतात ज्यांचं अंतस निर्मळ आहे.


व्यक्त होणाऱ्या अस्तित्वाला तेव्हाच ‘व्यक्ती’ म्हणावं जेव्हा अस्तित्व निर्मळ व त्याचं व्यक्त होणं रसाळ असेल ! अशाच ‘व्यक्ती’ला मी ‘प्रबुद्ध कृष्ण’ म्हणतो मग त्याच्या गळ्यात कोणाची ही व कोणतीही ‘माळ’ असो !

एकदा का तुम्ही ‘प्रबुद्ध कृष्णा’त स्थित झालात की मग तुमच्या डोक्यावर पगडी आहे की पागोटे, कपाळावर बिंदी आहे की मांगेत कुंकू, गळ्यात माळ आहे की क्रास, हातात पाटी आहे की फाळ, कमरेला धोतर आहे की जीन्स, पायात पादुका आहेत की पंपशूज यानं काहीही फरक पडत नाही.

जे जे आनंदमय ते ते जीवन. हा आनंद हेच ऐश्वर्य जगण्यातले. हे ऐश्वर्य हाच ईश्वर आयुष्याचा. या ईश्वराचा शोध हे जगातले सार्थक. ही सार्थकता बाहेरच्या धावपळीने नाही तर आतल्या प्रवासाने प्राप्त होते. आतला प्रवास श्वासाच्या मार्गाने होतो. या मार्गावरील प्रवासाने एकदा का ‘अंतस’ निर्मळ झाले की ‘बाह्य’ सारे वाणीद्वारे स्रवणाऱ्या रसांनी न्हाऊन निघते. असं अंतर्बाह्य न्हाणं त्या आनंदाला प्रसवतं ज्याला समृद्ध ‘जगणं’ म्हणता येईल.