पृष्ठे

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

माऊलीची अगम्यता



भाषेच्या विकासक्रमात दुर्बोधता हा अनिवार्य टप्पा असतो. अधिक माहितीस्तव मराठीतील सर्व प्रसिद्ध उदाहरण म्हणून कवी ग्रेस वाचावेत. सुरुवात अर्थातच मराठीची माऊली ज्ञानोबांपासून !

चिकित्सूंच्या माहितीस्तव ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील या प्रथम पाच ओवी येथे मुद्दाम देत आहे. चिकित्सकांनी ही मराठी आहे की संस्कृत आहे हे सांगावे. मराठी असेल तर उदाहरणांसह [ अर्थासह ] सिद्ध करून सर्वांस उपकृत करावे. [ हे वेगळे सांगायची गरज नाही की, संस्कृतातील गीतेचा अर्थ सामान्यांना कळावा म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली गेली.]

"नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥"

कायद्याचे हात

' कानून के हात बडे लंबे होते है | ' अशी संवादफेक चित्रपटाला टाळ्या मिळवून देते. पण ह्या लांबलचक हातांचे गौडबंगाल काही लवकर उलगडत नाही. हे हात, हाताचे धड त्यांची लांबी - रुंदी, कामे इ.च्या फंदात पडत नाही, पडू इच्छित नाही. पण नियती कोणाला टळली आहे. ह्या कानून आणि कानूनच्या तावडीत आपण रोजच सापडत असतो. 'शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ' अशी म्हण आहे पण कायद्याची, कोर्टाची माहिती घेऊ नये अशी काही म्हण नाही. म्हणूनच आपण या सदरात कानुनाचे जे हात असे ते प्रशासन याबद्दल थोडी थोडी माहिती घेऊ.

भारतासारख्या  लोकशाही राज्यात जनता सर्वोच्च, सार्वभौम असते. भारतातले कायदे आपणच म्हणजे भारतीय जनता म्हणजेच [व्यावहारिक सोयीसाठी] या जनतेचे प्रतिनिधी कायदे निर्माण करत असतात.त्यात बदल करत असतात. जुने कायदे रद्द करत असतात. या प्रक्रियेच्या सुगमतेसाठी, सोपेपणासाठी या प्रतिनिधी मंडळाला  काही अधिकार , विशेषाधिकार मिळालेले असतात. या अर्थाने कायदे करणारे हे मंडळ संबंधित राज्यातील सर्वोच्च संस्था बनलेली असते.

आजचा काळ आधुनिक,अत्याधुनिक आहे म्हणूनच कमालीचा गुंतागुंतीचा झाला आहे. ही गुंतावळ जगद्व्याळ आहे. यातूनच शासन - प्रशासन निर्माण झाले,वाढले, विस्तारले आहे.

आदिम मानवी समाजात सुरक्षा, व्यवस्था, नियंत्रण, वाढ व विकासाचे एक साधन म्हणून शासन व्यवस्थेची निर्मिती झाली. इतिहास साक्षीला उभा आहे कमीत कमी शासनाचा नियम मोडून अनियंत्रित अधिकारहीचा वापर करणाऱ्या साऱ्या शाह्या आपल्या सुलातानंंसह लयास गेल्या आहेत. हा अतिरेक सोडला तर शासन- प्रशासन ही एक निकोप सामाजिक संस्था आहे.


सामाजिक संस्थांचं अस्तित्व समाजावर अवलंबून असतं न कि समाजाचं अस्तित्व संस्थांवर. आज आपण अशाच शीर्षासनात उभे आहोत. गरज आहे ती सरळ होण्याची. तरच जग सरळ दिसेल जसे आहे तसे.

आपण म्हणजेच आपले शासन-प्रशासन आहे. आज ते - म्हणजेच आपण -सुखाच्या रोजीरोटीला  पारखले आहे.त्यात योग्य ते बदल करायची गरज आहे. चला तर बदलून टाकू सारी जुने शिडे, पुन्हा उभारू नावे तारु.

आपण काही विसरत तर नाही ना ? प्रथम ज्याला बदलायचं आहे त्याला समजून तर घेऊ. लोक व त्यांचे लोक सेवक माहित करून घेऊ अन् मग खुशाल बदलाच्या वावटळी उठवू.

म्हटलेलंच आहे ना 'Well begin is half done.'



शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

अंताचा आरंभ !

बस अजून काही क्षण आणि हे घटिका पात्र भरेल अन् मग 'राम'राज्याबाहेर. अगदी अखेरचे. प्राणप्रिय राम चालला म्हणून प्रजा रडत आहे, अयोध्या सोबत यायचं आग्रह धरते आहे. नेहमीप्रमाणे. पण आज कशातच लक्ष लागत नाही. मन सारं सैरभैर झालंय. काय करावं काही कळत नाही. पुरोहितांचा मंत्रघोष कानांना बधीर करतोय. पर्जन्यराजाची कृपा की रामाच्या मागोमाग रामाचा सारा प्रभाव धुवून काढायची जणू लगबग सुरु झाली आहे. शरयूनंही आज नेहमीपेक्षा जास्तच अंग फुगवलं आहे. लक्ष्मण शरयुतच झेपावला असं कळलं होतं. हे पक्कं होतं की तो शरयू पार करून गेला नाही, जाणारही नाही. अन् सीता ? तीही आता परत येणार नाही.

कुठे जावं ? सीते पाठोपाठ की लक्ष्मणाच्या मागे ?

सीता. ती खरी भूमिकन्या होती. अरण्याचं तिला खूप आकर्षण. जन्मलीचं होती शेतात. झाडे, वेली, झरे, गुहा, खिंडी, वाटा, धबधबे, मूलकंद सारं सारं तिला आवडायचं. राजमहालापेक्षा तिला झोपडीत शांत झोप यायची. सारं आयुष्य नियतीनं तिला अरण्यावासाचंच वरदान दिलं.

अन् लक्ष्मण ? एक वेडा जोगी. रामावर जीवापाड प्रेम केलं त्यानं. का ? कुणास ठाऊक ! रामासाठी बापावर तलवार घेऊन धावणारा.लक्ष्मण. त्यालाच ह्या रामानं जायला सांगितलं. का ? तर वचन. रामवचन! सीतेला पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं, का ? तर रामवचन ! लोकापवाद ! अन् म्हणे रामराज्य. रामानं आयुष्यभर कुरतडत जगायचं, प्राणप्रियांना छळायचं, आयुष्यभराची भळभळती जखम द्यायची अन् घ्यायची का , कशासाठी ? तर रामराज्यासाठी ! मर्यादांच्या उत्तम पालनासाठी !!

का मिळाली ही चेतना 'राम' म्हणून जगण्याची ? का मिळालं हे 'रामपण' वानरांना ही आकर्षिणारं ?  का मिळाली ही 'जाण' राजेपणाची ? का मिळाले हे 'भान' समूह संघटनाचे  ? का मिळालं 'मोठेपण' ज्यानं राजसिंहासनाची जबाबदारी दिली ? का मिळालं ते 'सामर्थ्य' साक्षात विश्वमित्रांना साह्य करणारं ? का मोडलं गेलं परशुरामाचं ते शिवधनुष्य ज्यानं सीता मला मिळाली ? का मिळाली सीता मला आयुष्यभर सलवणारी ? का ? का ? का ?

मला तर हवा होता तो चंद्रमागता राम,  मला तर हवा होता तो दशरथश्वास  राम,  मला तर हवा होता तो गुरुसेवक राम,  मला तर हवा होता तो सीताभारीत राम,  मला तर हवा होता तो अरण्यसेवी राम ! असा 'राम' रामाला कधीच मिळाला नाही.

रामानं तेव्हाच 'राम' म्हणायला हवं होतं जेव्हा सीता तिच्या बागेला सजवत होती अन् राम गुरुपूजनासाठी त्याच बागेतील फुले तोडत होता. तिथेच आम्हां दोघांची पहिली भेट झाली. " ऋषीकुमार," तिच्या मंजुळ पण ठाम स्वरांनी माझी एकाग्रता भंग झाली. मी दचकलो. गुलाबाच्या काट्यांनी क्षमा केली नाही. रक्ताळ अंगठ्याला दाबून धरत मी वळलो. " ही माझी बाग आहे व आपण पूर्व परवानगी न घेता खुशाल फुले तोडत आहात." तिच्या धनुष्याकृती भुवया अधिकच वक्रावल्या होत्या. मी घायाळ. स्तब्ध. दोन क्षण आणि ती खुदकन हसली. " एवढं घाबरू नका ऋषीकुमार." तिनं वाकून जखम जोडीचा पाला तोडला, चिमटीत दाबून रस काढला व तो माझ्या  रक्ताळ अंगठ्यावर लावून माझा अंगठा दाबला. मी शहारलो तेव्हाच सीता नाम धन्य झालो !

........किंवा मग धनुष्याला प्रत्यंचा लावताना माझ्या कपाळावर फुगलेली शीर पाहून विवाह साजसज्जित, शृंगार सुंदरा सीता नजरेला नजर देत मंद स्मित करत होती. ते स्मित माझ्या दंड बाहुंना आव्हान देवून गेलं अन् क्षणांत ते मजबूत शिवधनुष्य कडाड कड आवाज करून दोन भागात भंगलं. खरा विश्वामित्र शिष्य शोभलो जेव्हा सीतेने स्वीकारोक्ती नजरेनं पापण्या झुकवल्या. इथे ही 'राम' म्हणाला हरकत नव्हती. दुसऱ्यांनी राम नावाचा जयघोष केला अन् मी नियतीच्या फेऱ्यात अडकलो.

........किंवा मग वल्कलधारित सीतेच्या हातची कंदमुळे ओठांची गोडी वाढवत असताना  लक्ष्मण रक्षित शरदाच्या रात्री श्वासांची उष्णता चंद्राला धुसर बनवत असताना .........

.........किंवा आश्रमहरिणी सुस्नात सीता धबधब्याच्या धारेपल्याड पद्मासनात ध्यानास बसायची तेव्हा त्या जलप्रपाताचं ते प्रचंड संगीत त्या स्वच्छ नितळ पाण्याच्या पडद्या आडच्या त्या प्राणप्रियेचं जे रूप मनावर कोरायचं तेव्हा तरी 'राम' म्हणायची वेळ नक्कीच होती किमान माझ्यासाठी तरी.

पण........

आयुष्यात एक सीता 'पण' जिंकला आणि आणि आयुष्यभर सारा 'राम' पणात हारत गेलो. 'राम' कळायला अजून किती वेळा राम व्हायला हवं ते काही उमगत नाही.

लव-कुशासह आम्हां भावंडाची सारे मुले - सुना व त्यांची दळे घटिका पात्रावर नजरा ठेवून आहेत. माझ्या पाठोपाठ सारे आपापल्या क्षेत्रास जातील. आमची मुलं म्हणजे आम्ही तर नव्हेत ना ! त्यांना पराक्रमासाठी दिशा वाटून दिल्या. लव-कुश राम-लक्ष्मण आहेत पण राहतीलच कशावरून ? नकोच ते. अश्वमेधाचे वारू नेहमीच केंद्रोत्सारी हवेत.

राजवस्त्रे उतरत होती. जगासाठी मी वानप्रस्थाला जात होतो पण मला माहित होतं मी आता वनात जाणार नाही. सीतेच्या भेटण्याची भीती नव्हती तरीही. मला माहितेय, 'राजा' रामावर कोणीही प्रेम करत नाही, केलं नाही. ना सीतेनं, ना लक्ष्मणानं, ना अगदी रामानंही. 'राजा' राम अगदी ....... अगदी एकटा होता, असतो, राहील. आज राजेपणाची सारी चिलखतं उतरवून निघालो होतो 'रामापार' !

   

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

ययातीची अमरता

प्राचीन भारतीयांनी इतिहासाला भूतकाळाऐवजी संस्कृती-मूल्यांचा आधार दिला. ज्याचे स्वत:चे असे फायदे तोटे मिळाले. ज्यांची ऐतिहासिकता अजून पूर्णपणे सिद्ध, मान्य झाली नाही पण संस्कृती - मूल्यता सार्वकालिक, सार्वलौकिक अन् सार्वभौमिक मान्यता पावली त्या भारतीय महाकाव्यांनी - रामायण, महाभारताने - भारतीय जनमानसावर केलेले गारुड हा एक अभ्यासाचा विषय आहे.

अगदी विसाव्या शतकातसुद्धा आधुनिक भारतीय भाषांना महाभारताने विषय पुरवले आहेत. मराठीला पहिलं ज्ञानपीठ देणारी  सर्वप्रसिध्द कादंबरी ' ययाती ' महाभारताचीच देन आहे. आज पुन्हा एकदा महाभारत घडतंय पाल्य - पालकांत, सोप्या शब्दांत  आई-बाप व मुलांत, सरत्या उगवत्या दोन पिढ्यात आणि म्हणूनच ययातीची पुन्हा आठवण झाली कारण त्याची प्रासंगिकता आम्ही आमच्या कृतीनं अमर बनवली आहे.

मूळ ययाती व खांडेकरांची `ययाती` बऱ्याच विषयांना स्पर्श करतात.फक्त एवढी एकच कादंबरी नीट समजून घेतली तरी एका सामान्य माणसांचं जगणं सुसह्य होईल इतका आवाका यात आहे. आज आपण त्यातल्या एका बाबीवर विचार करू.

ययातीची  गोष्ट एक रेखीय नाही तर ती एक वर्तुळाकार कथा आहे. म्हणजे ययातीचं  ययातीपण एका बिंदूची, घटनेची देन नसून घटनांच्या शृंखलाचं अस्तित्व आहे. सामन्यत: ययाती काममोहित, कामपिपासू व्यक्ती म्हणून ओळखला जातो पण ययाती फक्त इतकाच नाही. तो अजूनही बराच काही आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची देन आहे, काममोहित होणं असंयमाचं लक्षण आहे, कामपीडित असणं दमनाचा अतिरेक आहे व कामवासना संस्कृतीची विकृती आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची स्थिती आहे. ती निसर्गाची गरज आहे, निसर्गाच्या अस्तित्वाचा आधार आहे म्हणून ती प्रकृती आहे. कामवासना मनाची विकृती आहे कारण तो हव्यास आहे. गरजेपेक्षा जास्तीची मागणी आहे. निसर्गाच्या विरोधात बंड आहे. ययातीला हा हव्यास परंपरेने मिळालेला होता. त्याची सुरुवात स्पर्शभावित प्रेमाच्या नकाराने होते.

ययातीचा पराक्रमी बाप इंद्राचं राजसिंहासनप्राप्त करतो व इंद्राणीच्या उपभोगाची इच्छा करतो. इंद्राणी मागणी करते की जर तू विद्वान, ऋषी मुनींनी वाहून आणलेल्या पालखीत बसून येशील तरच मी तुझा स्वीकार करीन. पालखीत बसलेल्या कामांध राजाला दुबळ्या विद्वानांची मंद गती सहन न होऊन तो एका ऋषीला लाथ मारून वेगात चालायला सांगतो व ऋषी त्याच्या वंशाला सुखी न होण्याचा शाप देतो.

अशी सुरुवात मिळालेला ययाती. ययातीची आई आपल्या स्त्रीलंपट नवऱ्याला बांधून ठेवण्यासाठी आपल्या यौवनाचं रक्षण,संवर्धन करण्यावर जास्त लक्ष देते. ती तिची अनिवार्यता आहे. सवतीमत्सराच्या जीवघेण्या जगण्यापेक्षा मुलांना त्यांच्या हक्कांपासून,गरजांपासून दूर ठेवलं जातं.

ययाती आईच्या दुधाला पारखा होतो कारण त्याच्या आईला त्याच्या बापासाठी आपल्या छातीचे उभार ओघळू द्यायचे नव्हते. ही पुरुषसत्ताक मानसिकतेची परिणती होती व आजही आहे.

जोपर्यंत  फ्राइड पूर्णपणे चुकीचा ठरून नाकारला जात नाही तोपर्यंत तरी तो एक मानसशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो माणसाचं व्यक्तीमत्व त्याच्या बालपणीच्या अनुभवांनी आकारास येतं [ वाचा फ्राइड- मनोलैंगिक विकास ]. ययातीची कामपिपासा त्याच्या मातृप्रेमाच्या गरजेची प्रतिक्रिया तर नव्हे ? कोण जाणे ?

आजही अशा खूप स्त्रिया आहेत ज्या आपल्या मुलांना स्वत:चं दूध पाजत नाहीत. गृहीत धरा त्यातल्या ९० % स्त्रिया योग्य, वैद्यकीय कारणांमुळे दूध पाजत नसाव्यात. [ हे गृहीतक लेखक पुरुष आहे व त्याला स्त्री राज्याची पूर्ण माहिती नाही यावर आधारित आहे.] पण उरलेल्या १० % स्त्रिया ज्या जाणता-अजाणता आपल्या तान्हुल्यांना आईच्या दुधापासून वंचित ठेवत आहेत त्यांचं काय ? सावधान माता `कुमाता' बनू नयेत.

आजकाल सरकार तर्फे यासंदर्भात बऱ्याच जाहिराती, प्रदर्शने जनहितार्थ प्रकाशित होत आहेत. डॉक्टर सामान्यत: सर्वच स्त्रियांना किमान सहा महिने तरी नवजात शिशुंना आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, गरीब, अशिक्षित स्त्रियांमध्ये दूध न पाजण्याची मानसिकता दिसून येत नाही जर तसेच काही सबळ कारण नसेल तर. शरीराचे सौंदर्य हा आधार जाणून बुजून असो की न जाणता असो उच्चभ्रू, उच्च शिक्षित, श्रीमंत स्त्रियांत हे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

कल्पनारम्य, ललित, अनैतिहासिक असे महाभारत असो की ययाती कादंबरी असो ,फ्राइड असो की सरकारी जाहिराती, डॉक्टर सांगोत कि न सांगोत नवजात शिशूंचा हा हक्क आहे, ती त्यांची गरज आहे आणि ही बाब पूर्णपणे वैज्ञानिक व प्रासंगिक आहे की आईचे दूध प्रत्येक बालकाला किमान सहा महिने मिळालेच पाहिजे.

एका  स्वस्थ, निकोप व्यक्तिमत्वासाठी व सुरक्षित समाजासाठी हे मातांनो, तुम्ही आपल्या पाडसांवर प्रेम कराल ना ?


सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुसती लक्ष्मणरेषा

सरत्या पावसाची भुरभूर तनामनाला भिजवत होती तरीही थंडावा काही मिळत नव्हता. नेहमीच्या गतीने जात होतो तरी पायातलं जडत्व मरणयातना देत होतं. पहाटतारा उगवण्यापुर्वी जायचं होतं दूर. खूप दूर. अनंतापार. माझी दत्तचित्त चेतना गेल्या काही रातींपासून प्रचंड अस्वस्थ झाली होती. आता असह्य झालं होतं. उर्मिलेला ते जाणवलं होतं पण तिनं काही विचारलं नाही. नेहमीप्रमाणे. आजची सांज एक गहन स्वस्थता देवून गेली. आता निर्णय पक्का झाला होता.

रामद्वारावरचा हा शेवटचा पहारा असणार होता. पहाऱ्यासाठी नेहमीच भांडणारा भरत आज कसा कोण जाणे एकदम तयार झाला. दुसरा प्रहर होईस्तोवर प्रकृती, नगर आणि राजकाज शांत झालं. नेहमीची शांतता असह्य होत होती. रामदादाचे डोळे माझ्या अस्तित्वानं अर्धोन्मिलीत झाले. अर्धा लक्ष्मण तेव्हांच मेला होता ज्यावेळी रामानं सीतेची लंकेत अग्निपरीक्षा घेतली होती. त्यावेळेपासून लक्ष्मणाचे ओठ अन् रामाचे डोळे परस्परांसाठी अर्धोन्मिलीत झाले.

नेहमीप्रमाणे  साष्टांग नमस्कार न करता मी गुडघे टेकून दोन्ही हात व कपाळ रामाच्या पायावर ठेवलं कारण आता निर्णय पक्का झाला होता. साष्टांग नमस्कार केला अन् पुन्हा त्या जुन्या रामप्रेमानं उसळी मारली तर ....  हा तर टाळायचाच होता. तरीही शेवटी डोळ्यांनी दगा दिलाच. अश्रूंच्या शरयूधारा रामचरणांना भिजवू लागल्या. पण नेहमीची लक्ष्मणवाणी खोल ह्रदयगर्भातून कपाळ टेकल्या वेदनेतून वर आली.

" दादा, आता आज्ञा द्यावी."  शेवटच्या हस्तस्पर्शानं शेवटची मागणी केली.

" तूही जाणार लक्ष्मणा  ? "  रामाच्या त्या दोन अश्रूंनी धनुष्य ठेवून राकट झालेल्या माझ्या खांद्यांना विचारलं.

सारं  बोलणं न बोलताच संपलं. मी उठलो. रामाच्या अश्रूंनी भिजलेला कंठा मंद उजेडात चमकला. प्राणप्रिया सीतेच्या वियोगानं झाडांना कवटाळून रडणारा राम मी पाहिला होता, शक्ती लागल्या लक्ष्मणाला मांडीवर घेवून रणांगणावर रडणारा राम मी पाहिला होता त्या `रडक्या` रामांनी मला आपल्या प्रेमात बांधून ठेवलं होतं पण आजचा हा अश्रूनयन राम मी स्वत:हून सोडून जात होतो.

रामाशिवाय मी जगूच शकत नव्हतो पण आता रामासोबत जगणं ही शक्य नव्हतं. जिच्या रामप्रेमाच्या प्रेरणेनं आजवर मी रामासोबत होतो ती रामप्रिया सीता ही आता नव्हती. आजवर ज्या लोकसेवेच्या निष्ठेनं राजकर्तव्यांचा  काटेरी सहवास सहन केला, ज्यांनी रामाला राम म्हणून जगू दिलं नाही,सीतेला सीता म्हणून जगू दिलं नाही त्यांच्यासाठी आता लक्ष्मणानं का जगावं ?

सीता  वहिनी गेली आणि मी  त्या वचनातून मुक्त झालो जे तिला वाल्मिकीच्या आश्रमात सोडताना दिलं होतं. अजून ही लख्ख आठवतंय, सीतेला वाल्मिकींच्या आश्रम सीमेवर सोडलं तेव्हा आभाळही रडत होतं.

"लक्ष्मणा रथ का थांबवला ?" या प्रश्नानं दाबून धरलेला माझा बांध फुटला. एक क्षण आणि तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य मावळलं.

" पुन्हा एकदा 'राजा' राम !" आपलं गर्भार जडत्व सावरत ती एवढंच म्हणाली.

मी रथाचा ध्वजदंड धरून स्वत:ला सावरत होतो. सीतेनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.

" मला आधार दे, लक्ष्मणा ! " वाणीची धार व हाताची पकड त्या सुकुमार शरीराला जुळत नव्हती. ही सीता माझ्यासाठी नवीन होती. मी शहारलो.

सावकाश रथातून उतरत ती म्हणाली," ही बेहद्द रामप्रेमाची फळं आहेत बाबा."

माझा हात हातात घेवून ती म्हणाली," आठवतंय का लक्ष्मणा, ती मारीच हाक ? परशुरामाला हरवणाऱ्या रामाची आसमंतात गर्जलेली ती आभासी हाक त्या मारीच्याची शेवटची मृगमरीचीका ठरली. अन् माझ्या हृदयानं तुझ्या चारित्र्यावर असूड फोडले त्या वेड्या रामाप्रेमानंच ना ! कधी कधी संस्कृतीचे संस्कार संहारास कारणीभूत होतात. तू नको म्हणाला होतास तरी मी भिक्षादानाच्या महान पुण्य प्रेमाला बळी पडून लक्ष्मणरेषा ओलांडली अन्  रामायण घडवून आणलं तेही प्रेमानंच ना ! आज पुन्हा त्या प्रेमानंच तुला मला एक वचन द्यावं लागेल बघ."

"माझ्या  मागे रामाची साथ सोडणार नाहीस ना ! तो खूप एकटा आहे रे ! आणि एक गुपित सांगू का ? रामाला सोडून सगळ्यांना सांग. सीतेपेक्षा ही लक्ष्मण रामाच्या खूप जवळ आहे रे !"

ही वेदना होती की काय मला कधीच कळलं नाही. मी भरल्या गळ्यानं म्हणालो," सीताराम हेच माझे प्राण,वहिनी !" तिचं तेव्हाचं भविष्य सूचक मंद स्मित मला आज उमगलं.

अंधाऱ्या चिखलात तिची पद्म पावलं उमटवत  जाता जाता  मात्र ती कडाडली ," आणि म्हणावं त्या महाबाहोला - ज्यानं ते महान शिवधनुष्य मोडून मला जिंकलं होतं - सीता ही एक क्षत्राणि आहे, जिनं त्याच शिवधनुष्याचा गाडा-घोडा करून आपले खेळ खेळले होते, तिच्यावर असं सामान्यांसारखं प्रेम करू नकोस. सोहेच्या क्षमतेने ही भूमी कन्या सीता सारं काही सहन करील पण असा लेचापेचा, कुंपणाआडून प्रेम करणारा  राम तिला बिलकुल आवडणार नाही."

सीता  गेली अन् रामातला `राम' गेला म्हणजे आता सीताही नाही आणि राम ही नाही मग लक्ष्मणाचं  अस्तित्व ते काय ?  मी निघालो. अनंताच्या प्रवासाला.

रामाच्या महालाबाहेर येवून मी उर्मिलेला एवढंच म्हणालो," मी जातो उर्मिला " तिनं माळता गजरा तसाच ठेवला. थंड दगडी पाउल वाटेवरच्या माझ्या पावलांनी राम, उर्मिला व अयोध्येचा निरोप घेतला. अथांग शरयूच्या प्रवाहानं मला अलगद कवेत घेतलं तेव्हा कोणतंही प्रेमळ अस्तित्व साक्षीला नव्हतं मला अडवून धरायला.


रविवार, २० नोव्हेंबर, २०११

गबरू दोस्त

दुसऱ्या दिवशीही वाघोबाने नाकासमोरच्या माश्या चुकवताना मान हलवली व त्याच वेळी मातोश्री वाघीण बाईंची शेपटी चाबुकाप्रमाणे चालली अन् गुबगुबीत वाघोबा थेट अस्वल काकांच्या मधाच्या बरणीला धडकला. "अरे हो, हो सावकाश." अस्वल काकांनी त्याला सावरलं तोवर वाघ-वाघीण झेपा टाकत निघुन गेले.

वाघोबा उभा रहात होता तोच हांकचू हांकचू करत एक प्राणी उड्या मारतच आला अन् अचानक कोलांटी उडी मारून अस्वल काकांना धडकला. "शाबास गबरू आज फक्त एकदाच पडलास." अस्वल काकांनी डोळे मिचकावत म्हटलं व वाघोबाची ओळख करून दिली." गबरू हा तुझा नवा दोस्त वाघोबा आणि बरं का वाघोबा हा आमचा पहिला विद्यार्थी गबरू गाढवे."

"ये मित्रा गळाभेट करू " गबरू दोन पायावर उभा रहात म्हणाला.वाघोबानं त्याची गळाभेट टाळण्यासाठी झेप टाकली पण दोघे ही अंग न आवरून थेट अस्वल काकांच्या पोटावर धडकले."शाबास ! चांगली गुरुदक्षिणा देताय लाथा घालून " असं म्हणून अस्वल काकांनी दोघांना उठून बसवलं व नेहमीच्या सवयीनं दोघांना गुदगुल्या केल्या.मग काय त्या द्वाड पोरांनी त्यांनाही गुदगुल्या केल्या. अशी दंगामस्ती बराच वेळ चालली. इतकी की ते तिघेही हसून हसून तिथेच पसरले व तो दिवस संपला.

रात्री  वाघोबाला कुशीत घेवून त्याचं अंग चाटत वाघिणीनं विचारलं, "आज काय शिकवलं माझ्या बाळाला ?" एका दिवसातच बाळ हुशार झाला होता. तो म्हणाला," गुदगुल्या कशा कराव्यात व कशा करू नयेत."
" म्हणजे काय ?" " अगं आई , हा माझा पहिला धडा आहे." "असा का ?" म्हणून वाघोजीनी वाघोबाला गुदगुल्या करायला हात पुढं नेला. वाघोबा पटकन वाघिणीच्या मागे लपला व वाघोजीचा हात वाघिणीला गुदगुल्या करून गेला. सटाक करून वाघिणीची शेपटी वाघोजीच्या हातावर बसली "हा काय चावटपणा "वाघोजीनी  हसत म्हटलं, "बेटा धडा तर भलताच कठीण आहे." "झोपा आता." वाघिणीची डरकाळी गुफाघर हादरवून गेली पण तोवर वाघोबा गाढ झोपी गेला होता. 







पौष्टिक `पालक' !

सुट्टीचा वार रविवार. दुपारची घोरती शांतता. कुमारी मनीमाऊ, वय वर्षे ५,आजोबांचा चष्मा इवल्याशा नाकावर टेकवून दोन्ही हातांनी हनुवटीला आधार देवून पालथी झोपून काही तरी वाचत होती. चेहऱ्यावरचे धीर-गंभीर भाव दुपारच्या शांततेत भर टाकत होते.अचानक जाग आल्यावर आजी बाहेर आली. मानसी अर्थात मनीमाऊ झोपली असावी असं समजून आजी तिच्या जवळ गेली तर बाईसाहेब एकाग्रतेने वाचत होत्या."काय वाचतेस माऊ ?" आजीने विचारलं. पहिलं पान दाखवत माऊ म्हणाली," आदर्श बालसंगोपन." आजीच्या विस्फारल्या नजरेचं उत्तर देत ती म्हणाली,"अगं आजी, मला नको का कळायला की माझं संगोपन कसं व्हायला हवं व ते तसं होतंय की नाही ?"

हा एक विनोद असला,वाटला तरी ती काळाची अनिवार्यता आहे. बालकांच्या बालक म्हणून असणाऱ्या व ते बालक आहेत म्हणून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या समस्या एक मोठी सामाजिक अव्यवस्था निर्माण करत आहेत. बालकांच्या एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या विकासाला आई-बाप, पालक, कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्र, पर्यावरण, सामाजिक संस्था, शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मीय  आर्थिक राजकीय सामाजिक असा एकूणच परिवेश कारणीभूत ठरतो.

आपण येथे वरील सर्वांचा विचार करू या. एक सुजाण,स्वस्थ व्यक्ती व समाज निर्माण करण्यात आपापला खारीचा वाटा उचलू या.

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

हेचि फळ तव तपाला !

"मुनिवर, हे काम तुम्हीच करू शकता. माझी शपथ आहे तुम्हांला. लिहून ठेवा हे सगळं. त्याशिवाय जगाला कळणार कसं की ही रमवणारी रामकथा नसून सतावणारी सीताकथा आहे." असं म्हणून कोसळत्या पावसात मला सावरायची संधी न देता सीता गर्द अरण्यात निघून गेली.

मला माहीत होतं ती तिच्या नेहमीच्या आवडत्या त्या काळगुहेतच जाणार. पण यावेळी पुन्हा परत न येण्यासाठी. बऱ्याचदा मी तिचा पाठलाग करत तिथंवर गेलो होतो.पण आत जायची हिम्मत झाली नव्हती. मृत्युदर्शी लांबीचा गडद अंधार होता आत अन् त्यावेळी त्या गर्भवती सुकुमार राजमहिषीचं ते एक अत्यंत आवडतं ठिकाण होतं. आजसुद्धा आहे. बऱ्याच वर्षांपासून त्या भागात रहात असूनही मला ही गुफा सापडली नव्हती.पण सीतेनं कसं कुणास ठावूक ते ठिकाण आश्रमात येताच शोधलं होतं. त्या गुहेचा आकार - उकार अनाकलनीय होता जणू भूगर्भीय पाताळाचं प्रवेश द्वारच !

गेली. सीता गेली. परत न येण्यासाठी गेली. ती भूमिपुत्री आपल्या भूमातृ गर्भात सामावली. त्या काळगुहेत गेली अखेरची. अन् रामातला सारा रामच गेला.सारी रम्यता गेली. सारी सीतलता गेली. तो आजानुबाहू राम आपादहस्त राम झाला.

मी नयनाभिराम पाहिला होता. मी बाणपाणि राम पाहिला होता. मी राजदंडपाणि राम पाहिला होता. मी राजा राम पाहिला होता. मी रणसिंह राम पाहिला होता. मी अगतिक राम ही पाहिला होता पण हा निसत्त्व राम मला पाहवेना. पडत्या पावसाची कृपा की राजमुकुटावरून ओघळत्या जलधारांसह ते रामाश्रू ही मुक्तपणे झरत होते.

दिसूनही कळत नव्हतं जगाला की हा रमवणारा ही  रडतोय. अदृश्य राजमुकुटाचे मोती ओघळत होते. आयुष्यात पहिल्यांदा. सर्वांसमोर. मुक्तपणे. राजासह प्रजा खालमानेनं राजधानीकडे वळली.त्या शापित राजधानीकडे जिला व जिच्या राणीला परस्परांचं सहवास सौख्य नव्हतं.

सीमेचं आपलं असं अस्तित्व जवळ जवळ नसतंच पण काम मात्र खूप मोठं असतं दोन खंडांना जोडण्याचं. नियतीला आपल्या खेळात स्वत:कडून स्वत:च स्वत:ला  रडवून घ्यायची खूप वाईट खोड आहे. नारदाच्या नादानं 'बी घडलेला' मी - वाल्मिकी - चिखल तुडवत माघारा वळलो.

ना त्या दिवशी तो नारद भेटला असता ना मी वाल्या कोळी वाल्मिकी बनलो असतो. अजूनही आठवतंय. त्यादिवशी माझ्यारुपानं साक्षात मृत्यु समोर असताना ही नारदानं मला स्वत: साठी जगायची नजर दिली कारण मी ज्यांच्यासाठी जगत होतो ते माझ्या अनिष्टाचे भागीदार होऊ इच्छित नव्हते. हा स्वचा शोध मला माहीत नव्हता. नारादानं काही तरी साधना करायला सांगितली. मला काय माहीत साधना कोणत्या घरी राहायची ते.

हसून नारदानं म्हटलं होतं," तुझं मन ज्यात रमेल ते कर." तो खरा गुरु बनत होता.मी इरसाल शिष्य झालो होतो. मला त्याच्याकडूनच मंत्र,साधन हवं होतं. माझी इच्छा गुरूनं नुसतं मार्ग दाखवण्याइतपतच मर्यादित राहावं अशी नव्हती तर मला काही काळ तरी उचलून घ्यावं अशी होती.नारादानं एक पांगुळ गाडा हाती दिला. "राम,राम,राम." कधीतरी मी स्वत:हून चालावं यासाठी. भले शाबास ! आम्ही पांगुळ गाड्यालाच विमान समजून चालत राहिलो. त्यातच रमलो. त्या ऋणानुबंधानंच ऋषी झालो.

अजूनही आठवतोय तो दिवस. पावसानं  सृष्टीला न्हाऊ घातलं होतं. सवयीनं मी प्रात:स्नानाला निघालो होतो. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं त्या रम्य वेळी एक क्रौंच जोडपं मैथुन प्रेमात मग्न होतं. माणसापेक्षा हे पक्षीच खरे हुशार ज्यांनी मैथूनाला अंधाऱ्या रात्रीची काळीमा दिली नाही. सहज लक्ष गेलं अन् कळायच्या आत एक जोडीदार शिकाऱ्याच्या बाणाला बळी पडला. इतक्या दिवसांची तपश्चर्या बनली की बिघडली हे कळलंच नाही. ह्रदयानं पहिल्यांदा तोंड उघडलं.

" रे दुष्टा,अधमा मारीलेस ह्या निष्पाप क्रौंच मिथूनाला |
 ध्वंसीलेस त्या सौंदर्या ह्या पोटाची खळगी भरण्याला  || "

नियतीचं  हे वरदान शापित ठरलं हे आज जाणवलं सीतेच्या या शब्दांनी. लव-कुशांना मांडीवर बसवून "रामो
राजमणी " ची विभक्ती शिकवतानाही सीतेच्या नजरेला ना जुमानलं ना अस्वस्थ झालो. पण आज भरल्या डोळ्यांनी सीतेच्या आत्म्याची ही काळकथा रामाच्या नावावर खपवायची होती. न स्वीकाराताही हे शिवधनुष्य सीता-राम प्रेमानं अंगावर आलं होतं. हे आदिकवित्व अनंताची ठसठस देवून जात होतं.


रिमझिम सुरुवात


पाऊस.रिमझिमता असो की कोसळता.[त्रास देणार नसेल तर] मला नेहमीच आवडतो.

काळ्या  आईच्या गर्भात वाट पाहणाऱ्या बीजांना ह्या सृष्टीचा पत्ता सांगणारा पाऊस मलाही वेणावतो. लिहित्या हाताच्या प्रसववेणा कल्पनारम्य लालित्याने सजून येथे बाहेर येत आहेत.

या  सदरात मत्प्रिय व्यक्तीरेखा पडत्या पावसातली आपली स्वगते सादर करीत आहेत. इतिहासाच्या कल्पना माझ्या कानी गुणगुणताहेत. मला जशी ती गुणगुण समजतेय तशी मी ती लिहीत जातोय.

एक  संपूर्ण काल्पनिक स्वगतसदर सुरु करीत आहे.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

काही नियम

आजकाल माणसांच्या भावना कधी दुखावतील याचा काही नेम नाही. त्यामुळे मोठे मोठे लोक, लेखक मंडळी या भावना नामक पदार्थास जरा वचकूनच असतात.आता आम्ही काही तसे लेखक बिखक नाही तरी लिहीत बिहीत असतो म्हणून हा स्पष्टीकरणाचा उपद्व्याप करत आहोत. आधीच काही नियम स्पष्टीकरण सांगितलेले बरे.

वाचकांसाठी  काही स्पष्टीकरणे -

१] लेखक कोणत्याही वेळी, कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय  नियम बदलण्याचा सर्वाधिकार सुरक्षित ठेवून नियम लिहीत आहे.

२] लेखांत येणाऱ्या उदाहरण,दाखले यांचा काथ्याकुट करण्यापेक्षा त्यातील मूळ विचार,सिद्धांत यावर जास्त लक्ष द्यावे.

३] लेखक कोणत्याही विषयाचा तज्ञ नाही.त्यामुळे प्रत्येक बाबीत अचूकता,वैज्ञानिकता इ.चा जास्त आग्रह धरू नये.आंबे खावेत झाडे मोजू नयेत.

४] ब्लॉगचा मुख्य विषय / आधार  माणूस म्हणून जगणे , माणूस म्हणून कसे जगावे, तसे जगताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय इ. बाबींवर विचारमंथन करणे, आपले विचार लिहून ठेवणे व स्वत: तसे जगण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

५] लेखक ना पूर्णपणे  योगी आहे ना पूर्णपणे  भोगी आहे पण योग व भोगावर जरूर लिहून ठेवू इच्छितो. नियतीशरण असहायपणे मध्यम मार्गाचा स्वीकार नव्हे तर वर्तमानाचा जसा आहे तसा स्वीकार करत आनंदाने जीवनमार्गावर चालताना समतापूर्वक प्रत्येक फुलाचा गंध घेत गुंजारव करण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग असेल.

६] बहुतांश लेखन ललित , कल्पनारम्य असेल पण इतरही विषयांचा रसास्वाद आवड व सवडीने घेतला जाईल.

७] शीर्षक व मूळ आधार थोडासा तात्विक,आध्यात्मिक वाटत असला तरी कोणताही विषय वर्ज्य नाही.

८] कृपया आपल्या भावना विना कारण दुखावून घेवू नये. जर एखादी गोष्ट पटली तर तिचा स्वीकार करावा न  पटली तर सोडून द्यावी.वादविवादाचे कारणच काय ? लेखक आपल्याला काहीही पटवून देवू इच्छित नाही ना त्याच्यासारखे वागण्याचा अतिरेकी आग्रह करतोय. विचार वाचा.समजले पटले तर जगा नाही तर विसरून जा. व्यर्थ चर्चा करू नये.

९] कोणतीही जाहिरात, स्वत:च्या ब्लॉगचे विवरण टिप्पणीमध्ये लिहू नये. "छान , खूप छान, असेच लिहीत राहा " इ.सामान्य टिप्पण्या लिहून ब्लॉग व इंटरनेटचे वजन वाढवू नये. तसेच खूप जास्तही लिहू नये. टिप्पणी म्हणजे ब्लॉगपोस्ट नव्हे हे लक्षात घ्यावे. विचार पटला तर तो जगा व इतर चार लोकांना सांगा आणि नाही पटला तर विसरून जा.

१०] भाषा समजण्याची जबाबदारी लेखकाची नाही. शक्यतो सामान्य,सहज,सरळ भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला जाईल पण लेखकीय उर्मी मारून [तथाकथित] सोप्या भाषेचा वापर केला जाणार नाही. 

११] 'माझिया 'जातीचा' मिळो मज कोणी | ' अशी इच्छा करून व 'माझिया 'जातीचा' मिळेल मज कोणी | ' अशी आशा धरून येथे लेखन केले जात आहे. ' तुमचिया जातीचा नसेन जर  मी ' व ' माझिया जातीचे नसाल जर तुम्ही ' तर बिघडले, बिघडेल कुठे, काय ? ' राहू सुखे आपुलिया जातीचे आपण गुण्या गोविंदाने | '


शिकवणीची सुरुवात

चंदन -वंदन जंगलाचे महाराज सिंव्हाजी आयाळे सहकुटुंब-सहपरिवार व सहमंत्रीमंडळ परजंगल दौऱ्यावर गेल्याने उपराजा वाघोजी पट्टेदार यांच्या मजबूत खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्या. अर्थात जबर कामाला त्यांची ना नव्हती ना त्यांच्या सहकारी जीवनधारिणी वाघीणीची. पण या कामाच्या गडबडीत त्यांचा छोटा, गोड,गुबगुबीत वाघोबा याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते.

वाघिणीला आपल्या लेकराच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. विचार करून शेवटी त्यांनी वाघोबाला जवळच राहणाऱ्या जुन्या जाणत्या मित्राच्या म्हणजे मधुकाका अस्वले यांच्या ताब्यात द्यायचे ठरवले कारण शिक्षकांपासून दाईपर्यंत,शाळेपासून पाळणाघरापर्यंत सारेच दौऱ्यावर होते.

सकाळीच  वाघोबाला तयार करून वाघ वाघीण अस्वल काकांकडे आले.नेहमी प्रमाणे अस्वल काका उन्हात पाठ गरम करत पोळ्यातला मध खाण्यात मग्न होते.आसपास माश्या उडत होत्या.त्यांची मधुकाकांनी दाखल घेतली नाही.त्यांनी मन वळवून वजनदार पावलांनी हादरणारी जमीन पाहिली.

"यावं, यावं महाराणी !" अस्वलकाकांनी वाघिणीला नमस्कार केला. "पुरे हं काका. " वाघीण बाई लाजल्या.पण मनात सुखावल्या. बऱ्याच वर्षांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होत होती महाराणी बनण्याची. "ये बाळ." अस्वल काकांनी वाघोबाला जवळ बोलावलं. "राजगुरू पोपटोजी लालनाके परत येईपर्यंत  मीही राजगुरू पद  उपभोगतो."अस्वल काकांनी हसत वाघोजीस म्हटले.

वाघोबा मान हलवत होता.वाघिणीला वाटलं तो नाही नाही म्हणतोय पण तो तर नाकापाशी गुणगुण करणारी माशी हटवत होता. "जा की ठोंब्या ." म्हणून वाघिणीने शेपटीने फटका मारला. अचानक काही कळायच्या आत वाघोबा थेट अस्वल काकांच्या मांडीवर गेला. अस्वल काकांचा एक लांबलचक केस त्याच्या नाकात गेला व तो सटासट शिंकला. अस्वल काकांनी डोळे झाकत गडगडाटी हसत पोट हलवल. त्यांच्या पोटावर वाघोबा मजेत वर खाली होत होता.

"आम्ही संध्याकाळी येतो." वाघिणीने सांगितले. "हो हो" अस्वल काका हो म्हणत होते की हो हो करून हसत होते ते कळत नव्हतं.वाघ-वाघिणीने शेपट्या हलवून टाटा  केलं व मोठ्या मोठ्या डरकाळ्या देत आपल्या कामाची सुरुवात केली.

अश्या प्रकारे आपल्या कथानायकाचा अस्वल काकांच्या शाळेत प्रवेश झाला. 

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

नावाचे कृष्णविवर !

नावाचे गौडबंगाल ते नाम महिमा इतके नावाचे अस्तित्व सर्वव्यापी आहे. इतके की ` देव येवो अथवा जावो | मुखी नाम त्याचे राहो |' प्रत्यक्ष ईश्वराशी आम्हांला काही घेणे देणे नाही त्याचे नाम फक्त मुखात राहो. अशी नावाची महिमा आहे. त्यामुळे ब्लॉगच्या नावापासूनच सुरु केलेली चांगली !

`प्रबुद्ध कृष्ण '-  कृष्ण या नामाचे प्रबुद्ध हे विशेषण घेतले तर 'ज्ञानी कृष्ण' [महाभारतातील देवकीपुत्र ] असा सरळ अर्थ होतो. याशिवाय प्रबुद्ध, ज्ञानी काळेपण [कृष्ण = काळा] असा ही अर्थ करता येतो. कृष्ण=काळा हा काळा काहीही, कोणीही,कुठेही, कसाही,कितीही. अजून एक म्हणजे प्रबुद्ध,ज्ञानी चुंबक/ आकर्षून घेणारा [कर्षति इति कृष्ण:  या अर्थाने ]. विद्वानांनी जरूर अजून अर्थ शोधावेत.

लेखकास अपेक्षित असणारा अर्थ - प्रबुद्ध कृष्ण म्हणजे ज्याने वा जिने परिपूर्ण ज्ञानप्राप्ती केली आहे,ज्यांस बुद्धत्वाची आत्मिक अवस्था प्राप्त झाली आहे अशी आकर्षक चेतना. असा बुद्ध जो कृष्णमय आहे वा असा कृष्ण जो समबुद्ध,संबुद्ध आहे.

या  नावाचे अनेक अर्थ, पदर हळू हळू उलगड जावू. हाच आपल्या संवाद प्रवासाचा आदी -मध्य- अंत असेल.

सुरुवातीसच  हे सुचवून ठेवतो की हा ब्लॉग प्रबुद्ध नावामुळे ना बौद्ध धर्माशी संबंधित आहे ना कृष्ण नावामुळे हिंदू धर्म,तत्वज्ञानाशी जवळीक सांगणारा आहे. तसेच भाषा गंभीर/अवघड  वाटली तरी आमचा तथाकथित अध्यात्म, कर्मकांडास दुरूनच नमस्कार आहे.

आपण माणूस आहोत ही बाब सार्वलौकिक आहे, आपण वर्तमानात जगतो ही बाब सार्वकालिक आहे, मानवाचे मूळ रूप आनंददायी आहे ही बाब सार्वभौमिक आहे या ब्लॉगवर माणसाच्या वर्तमानातल्या आनंदाची वाढ करण्याचा एक लेखीय प्रयत्न केला जाईल.

आनंदाची जोपासना व वाढ होत राहो !