पृष्ठे

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

हेचि फळ तव तपाला !

"मुनिवर, हे काम तुम्हीच करू शकता. माझी शपथ आहे तुम्हांला. लिहून ठेवा हे सगळं. त्याशिवाय जगाला कळणार कसं की ही रमवणारी रामकथा नसून सतावणारी सीताकथा आहे." असं म्हणून कोसळत्या पावसात मला सावरायची संधी न देता सीता गर्द अरण्यात निघून गेली.

मला माहीत होतं ती तिच्या नेहमीच्या आवडत्या त्या काळगुहेतच जाणार. पण यावेळी पुन्हा परत न येण्यासाठी. बऱ्याचदा मी तिचा पाठलाग करत तिथंवर गेलो होतो.पण आत जायची हिम्मत झाली नव्हती. मृत्युदर्शी लांबीचा गडद अंधार होता आत अन् त्यावेळी त्या गर्भवती सुकुमार राजमहिषीचं ते एक अत्यंत आवडतं ठिकाण होतं. आजसुद्धा आहे. बऱ्याच वर्षांपासून त्या भागात रहात असूनही मला ही गुफा सापडली नव्हती.पण सीतेनं कसं कुणास ठावूक ते ठिकाण आश्रमात येताच शोधलं होतं. त्या गुहेचा आकार - उकार अनाकलनीय होता जणू भूगर्भीय पाताळाचं प्रवेश द्वारच !

गेली. सीता गेली. परत न येण्यासाठी गेली. ती भूमिपुत्री आपल्या भूमातृ गर्भात सामावली. त्या काळगुहेत गेली अखेरची. अन् रामातला सारा रामच गेला.सारी रम्यता गेली. सारी सीतलता गेली. तो आजानुबाहू राम आपादहस्त राम झाला.

मी नयनाभिराम पाहिला होता. मी बाणपाणि राम पाहिला होता. मी राजदंडपाणि राम पाहिला होता. मी राजा राम पाहिला होता. मी रणसिंह राम पाहिला होता. मी अगतिक राम ही पाहिला होता पण हा निसत्त्व राम मला पाहवेना. पडत्या पावसाची कृपा की राजमुकुटावरून ओघळत्या जलधारांसह ते रामाश्रू ही मुक्तपणे झरत होते.

दिसूनही कळत नव्हतं जगाला की हा रमवणारा ही  रडतोय. अदृश्य राजमुकुटाचे मोती ओघळत होते. आयुष्यात पहिल्यांदा. सर्वांसमोर. मुक्तपणे. राजासह प्रजा खालमानेनं राजधानीकडे वळली.त्या शापित राजधानीकडे जिला व जिच्या राणीला परस्परांचं सहवास सौख्य नव्हतं.

सीमेचं आपलं असं अस्तित्व जवळ जवळ नसतंच पण काम मात्र खूप मोठं असतं दोन खंडांना जोडण्याचं. नियतीला आपल्या खेळात स्वत:कडून स्वत:च स्वत:ला  रडवून घ्यायची खूप वाईट खोड आहे. नारदाच्या नादानं 'बी घडलेला' मी - वाल्मिकी - चिखल तुडवत माघारा वळलो.

ना त्या दिवशी तो नारद भेटला असता ना मी वाल्या कोळी वाल्मिकी बनलो असतो. अजूनही आठवतंय. त्यादिवशी माझ्यारुपानं साक्षात मृत्यु समोर असताना ही नारदानं मला स्वत: साठी जगायची नजर दिली कारण मी ज्यांच्यासाठी जगत होतो ते माझ्या अनिष्टाचे भागीदार होऊ इच्छित नव्हते. हा स्वचा शोध मला माहीत नव्हता. नारादानं काही तरी साधना करायला सांगितली. मला काय माहीत साधना कोणत्या घरी राहायची ते.

हसून नारदानं म्हटलं होतं," तुझं मन ज्यात रमेल ते कर." तो खरा गुरु बनत होता.मी इरसाल शिष्य झालो होतो. मला त्याच्याकडूनच मंत्र,साधन हवं होतं. माझी इच्छा गुरूनं नुसतं मार्ग दाखवण्याइतपतच मर्यादित राहावं अशी नव्हती तर मला काही काळ तरी उचलून घ्यावं अशी होती.नारादानं एक पांगुळ गाडा हाती दिला. "राम,राम,राम." कधीतरी मी स्वत:हून चालावं यासाठी. भले शाबास ! आम्ही पांगुळ गाड्यालाच विमान समजून चालत राहिलो. त्यातच रमलो. त्या ऋणानुबंधानंच ऋषी झालो.

अजूनही आठवतोय तो दिवस. पावसानं  सृष्टीला न्हाऊ घातलं होतं. सवयीनं मी प्रात:स्नानाला निघालो होतो. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं त्या रम्य वेळी एक क्रौंच जोडपं मैथुन प्रेमात मग्न होतं. माणसापेक्षा हे पक्षीच खरे हुशार ज्यांनी मैथूनाला अंधाऱ्या रात्रीची काळीमा दिली नाही. सहज लक्ष गेलं अन् कळायच्या आत एक जोडीदार शिकाऱ्याच्या बाणाला बळी पडला. इतक्या दिवसांची तपश्चर्या बनली की बिघडली हे कळलंच नाही. ह्रदयानं पहिल्यांदा तोंड उघडलं.

" रे दुष्टा,अधमा मारीलेस ह्या निष्पाप क्रौंच मिथूनाला |
 ध्वंसीलेस त्या सौंदर्या ह्या पोटाची खळगी भरण्याला  || "

नियतीचं  हे वरदान शापित ठरलं हे आज जाणवलं सीतेच्या या शब्दांनी. लव-कुशांना मांडीवर बसवून "रामो
राजमणी " ची विभक्ती शिकवतानाही सीतेच्या नजरेला ना जुमानलं ना अस्वस्थ झालो. पण आज भरल्या डोळ्यांनी सीतेच्या आत्म्याची ही काळकथा रामाच्या नावावर खपवायची होती. न स्वीकाराताही हे शिवधनुष्य सीता-राम प्रेमानं अंगावर आलं होतं. हे आदिकवित्व अनंताची ठसठस देवून जात होतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा